मोहदा येथील सरपंच उपसरपंच यांच्या पुढाकाराने मिळाली दिव्यांगाना आर्थिक मदत

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : मौजा मोहदा ग्रामपंचायत अंतर्गत येथील दिव्यांगाना (ता.23 जून) रोजी सरपंच वर उपसरपंच यांच्या पुढाकाराने सामान्य फंडातूनमधून दिव्यांगाना आर्थिक मदत धनादेश वाटप करण्यात आले .
मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात दिव्यांगाना अनेक आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.हाताला काम नसल्याने त्यांची आर्थिक बाब अतिशय हलाकीची होती. त्यामुळे दिव्यांगाची आर्थिक चनचन येथील सरपंचा सौ वर्षा रवींद्र राजूरकर व उपसरपंच श्री सचिन रासेकर यांनी लक्षात घेवून गावातील दिव्यांगाना सामान्य फंडातून 2000/- हजार रुपयाचा लाभ मिळवून दिला.
त्यात विना प्रदीप ढवळे, कुणाल मारोती कनाके, शिवम संतोष पखाले, नंदकुमार नामदेव कुचनकार, विद्या माणिक केळझरकर, नागो नामदेव दूधकोहळ, ओम निकाश बोथले, कल्पना नामदेव मेश्राम अनुसया हरिदास केळझरकर, मारोती परशराम मडावी, प्रवीण मारोती उरकुडे, हेमंत अनिल कुचनकार, अनिल महादेव भुंबर यांचा समावेश आहे.
उपस्थित सदस्य गणेश बोन्डे व गजानन शेलवडे, सौ अर्चना गेडाम, सौ सीमा ढुमणे, सौ बेबीताई उईके, सौ शोभाताई टेकाम, सौ सुवर्णा बोन्डे यांचे मार्फत दिव्यांगाना आर्थिक लाभ देण्यात आला. लाभार्थ्यांनी यावेळी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे मनस्वी आभार मानले. 

कात्री येथे बस स्टॉप परिसरात खुलेआम दारू विक्री

रूस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : दुबार पेरणीचे संकट असल्या मुळे शेतकरी व शेतमजूर हे आर्थिक अडचणीत आले असून व्यसना कडे वळत आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या होण्याची दाट शक्यता आहे.

याबाबत सविस्तर वृत्त अशी की कळंब तालुक्यातील कात्री येथे बस स्टँड परिसरात अवैधरित्या दारू विक्री सुरू असल्याने काही व्यक्ती दारू पिऊन अश्लिल भाषेत शिविगाळ करतात त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी महिला व शाळेत जाणाऱ्या विदयार्थाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पोलीस विभागाचे या वर नियंत्रण नसल्याने बिट जमादार यांच्या आर्शिवादाने बस स्टॉप परिसरात अवैद्य दारू विक्री खुलेआम सुरु असुन दारू विक्रेत्याचे मनोबल वाढल्याने अरे रावीची भाषा बोलत आहे.
गावात दारू मिळत असल्याने युवा वर्ग , शेतकरी , शेत मजुर व्यसनाधिन होत असुन गावात भांडण तंटे होऊन शांतता भंग होत आहे तसेच दारूचे अतिवेसना मुळे शेतकरी आत्महत्तेचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.
गावातील बस स्टॉप परिसरातील दारु विक्री बंद करण्या बाबत पोलीस अधिक्षक यवतमाळ यांच्या कडे गावातील काही प्रतिष्ठीत नागरीक , महिला बचत गटाचे कार्यकर्ते निवेदन देणार आहे.
तरी पोलीस विभागाने याची गांर्भियाने दखल घेऊन गावातील दारू विक्री बंद करावी अशी कात्री ग्रामवासीयांची मागणी आहे

दुर्भा येथील रेशन दुकानदारास धान्याचा अपहार भोवला

सह्याद्री | चौफेर न्यूज 

झरी : २४ जून तालुक्यातील दुर्भा येथील रेशन दुकानदाराने बोगस लाभार्थी दाखवित धान्याची उचल करून अफरातफर केली. त्याची माहिती अधिकार कायद्यानुसार रीतसर माहिती सामाजिक कार्यकर्ते बंडू देवळकर यांनी मागितली. त्यामध्ये अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून परवाना रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.
जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत दुर्भा येथील रेशन दुकान पाटणला अतिरिक्त दुकान जोडले गेले. रेशनच्या महिला दुकानदार वा. रा. आईटवार यांनी बोगस लाभार्थी दाखवून शासनाकडून नियमित लाभाची उचल करून अपहार केला. या प्रकरणी १८६.८९ क्विटल गहू २३५९.७३ रुपये क्विटलप्रमाणे ४,४१,००९ रुपये आणि १२७.६६ क्विटल तांदूळ ३४४४.१० रुपये क्विंटलप्रमाणे ४,३९,६७३ रुपये असे एकूण ८ लाख ८० हजार ६८२ रुपये वसूल करण्यात यावे. ही रक्कम शासनाच्या खजिन्यात ३० दिवसांत न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या रेशन दुकानाचा परवाना रद्द करावा व जोडलेले दुकान काढून घेण्यात यावे. लाभार्थीची गैरसोय होणार नाही या दृष्टीने संबंधित रेशन दुकान लगतच्या गावास जोडण्यास यावे, अशाप्रकारचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदार झरी जामणी यांना पाठविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा माहिती अधिकार कार्यकर्ते बंडू देवाळकर यांनी अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या प्रकरणाकडे राजकीय नेते व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते. तक्रारदारांनी रेशन दुकानदारावर तत्काळ एफआयआर दाखल करण्यात यावा अशी मागणी केली असून अन्यथा न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.

‘सामाजिक न्याया’चे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज

सह्याद्री | चौफेर न्यूज 

26 जून’ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवसाचे महत्त्व काय आहे ? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचे कोणते कार्य व सुधारणा केल्या ज्यामुळे आजच्या त्यांच्या जन्मदिनी राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात येतो. हे आपण या लेखात वाचणार आहोत.

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘26 जून’ हा शासन पातळीवर 2006 पासून ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 2006 पूर्वी शासन ‘26 जुलै’ हा दिवस शासनाच्या लेखी जन्मदिवस होता. त्यामुळे राज्यात सन 2003 पासून ‘26 जुलै’ हा दिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येत होता. सन 2006 मध्ये शासनाने इतिहास अभ्यासकांची समिती स्थापन केली. या इतिहास अभ्यासकांच्या समितीने आपला अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर केला त्यानुसार 27 मार्च 2006 रोजी शासन निर्णय काढून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जन्मतारिख 26 जून 1874 ही अधिकृत ठरविण्यात आली. तेव्हा मित्रांनो 2006 पासून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘26 जून’ हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
महाराष्ट्रातील समाजसुधारणच्या चळवळीचे नांव ज्या तीन महापुरूषांचे नांव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. ते महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर. फुले-शाहू-आंबेडकर हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. इथल्या मातीच्या कणा-कणात या महापुरूषांच्या कार्याचा सुगंध दरवळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जसे स्वराज्याच्या जाज्वल्य भावनेचे प्रतिक आहेत. तसे फुले-शाहू-आंबेडकर हे समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या भावनेचे प्रतिक आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महात्मा फुले यांना आदर्श मानायचे. महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणेचा वारसा खऱ्या अर्थाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी पुढे चालविला. आज संपूर्ण देशातील बहुजन, दलित समाजातील जनता व चळवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत मानते हीच जनता व चळवळ महात्मा फुले व शाहू महाराज यांना गुरूस्थानी मानते. खऱ्या अर्थाने या चळवळीत महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता, सुवर्णमध्य साधणारा दुवा म्हणून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मनदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अशा कोणत्या सामाजिक न्यायाच्या सुधारणा व कार्य शाहू महाराजांनी केल्या आहेत. ज्यामुळे आज त्यांचा जन्मदिवस राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. ते आपण पाहू या ! गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत 2 एप्रिल 1894 रोजी खास दरबार भरवून त्यामध्ये शाहू महाराजांचे राज्यारोहण झाले. त्यानंतर महाराजांनी आपल्या पहिल्याच जाहीरनाम्यात, 'आपणाला मिळालेला राज्य अधिकार हा राजवैभव व राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून, तो आपल्या रंजल्या-गांजल्या प्रजाजनांच्या विशेषतः गरीब व अज्ञानी जनतेच्या उद्धारासाठी असल्याचे स्पष्ट केले.
1899 साली कोल्हापूरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शुद्र लेखले. राजालाच जर अशी वागणूक मिळत असेल तर प्रजेच काय ? असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला. वैयक्तीक अपमानाकडे सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून बघणारा हा राजा होता. याचा परिणाम म्हणजे महाराजांनी कुलकर्णी - महार वतने रद्द केली. त्यानंतर महाराज खऱ्या अर्थाने सत्यशोधक समाजाच्या विचारांकडे वळले.
26 जुलै 1902 मध्ये संस्थानांतील नोकऱ्यांमध्ये मागास जाती-जमातींसाठी 50 टक्के आरक्षण ठेवले, ब्राम्हण, प्रभू, शेणवी, पारशी या जाती वगळता इतर सर्व जातींना आरक्षणाचा लाभ दिला. 1908 मध्ये विद्याप्रसारक मंडळी ही संस्था स्थापन केली. भास्करराव जाधव, महादेव डोंगरे, बागल, शिंदे या जवळच्या लोकांना बरोबर घेऊन या संस्थेच्या माध्यमातून दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली. 1906 चा आदेश सांगतो की, कोल्हापूरात चर्मकार, ढोर, महार, मांग या समाजासाठी स्वतंत्र अशा 5 रात्र शाळा सुरू केल्या होत्या. या सर्व शाळा राज्यारोहणच्या प्रसंगी स्थापन झाले असल्याचा इतिहासात दाखला आहे.
14 फेब्रुवारी 1908 रोजी मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात आस्था निर्माण करण्यासाठी मिस क्लार्क वसतिगृह सुरू केली. 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली. दलित समाजाला सर्व प्रकारचे शिक्षण 24 नोव्हेंबर 1911 च्या आदेशान्वये मोफत केले. टोकाचा जातीभेद असणाऱ्या काळात 1918 साली आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा त्यांनी राज्यात लागू केला. शाहू महाराज हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या चुलत बहिणी चा विवाह इंदूरच्या यशवंतराव होळकर या धनगर समाजातील मुलाशी लावून दिला. मराठा राजघराण्यातील मुलीचा विवाह त्यांनी धनगर समाजातील मुलाशी लावून देऊन आंतरजातीय विवाह घडवून आला. आंतरजातीय विवाहासाठी स्वतःच्या घरून होणारा विरोध त्यांनी धुडकावून लावला. पुढे कोल्हापूर आणि इंदोर संस्थानात मराठा - धनगर आंतरजातीय विवाहाची योजना आखून 25 आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी त्या काळी लावून दिले.
शाहू महाराज - आंबेडकर भेट व स्नेहबंध – शाहू महाराजांनी सुरू केलेल्या ‘मिस क्लार्क’ वसतिगृहातील एक विद्यार्थी दत्तोबा संतराम पोवार हे कोल्हापूर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे चेअरमन होते. दत्तोबा पोवार हे शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक होते. त्यांनी 1917 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी परिचय करून घेतला होता. याच दत्तोबांनी डॉ. आंबेडकरांविषयी महाराजांना सांगितले. दलित समाजातील एक तरुण मुलगा शिक्षण घेऊन तयार झाल्याचे ऐकून महाराजांना आनंद झाला. त्या दोघांची भेट 1919 मध्ये झाली. दोघांचे स्नेहबंध दृढ झाले. दलितांची बाजू जनतेसमोर आणि भारत दौऱ्यावर आलेल्या साऊथबरो समितीसमोर मांडण्यासाठी डॉ. आंबेडकरांना वर्तमानपत्राची गरज भासू लागली. ही बाब बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी महाराजांच्या कानावर घातली आणि वर्तमानपत्र सुरू करण्याची योजना त्यांच्यासमोर ठेवली. महाराजांना ही योजना पसंत पडली आणि त्यांनी वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी तात्काळ अडीच हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यातूनच 31 जानेवारी 1920 रोजी 'मूकनायक' पाक्षिक सुरू झाले.
वकिलीच्या क्षेत्रात उच्चवर्णियांची हुकूमशाही मोडून काढली-
वकिलीच्या क्षेत्रातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी शाहू महाराजांनी 11 मार्च 1920 रोजी एका हुकूमान्वये करवीर इलाख्यातील सर्व कोर्टात वकिली करण्यासाठी रामचंद्र शिवराम कांबळे, रामचंद्र सखाराम कांबळे, दत्तात्रेय संतराम पोवार, तुकाराम अप्पाजी गणेशाचार्य, कृष्णराव भाऊसाहेब शिंदे, विश्वनाथ नारायण कुंभार, धोंडदेव रामचंद्र व्हटकर आणि कलेश यशवंत ढाले आदींना सनदा दिल्या.
माणगांव परिषद - दत्तोबा पोवार, गंगाराम कांबळे, तुकाराम गणेशाचार्य, शिवराम कांबळे, रामचंद्र कांबळे, निंगाप्पा ऐदाळे यांनी चर्चा करून माणगाव परिषद घेण्याची तयारी चालवली. त्यासाठी निंगाप्पा ऐदाळे डॉ. आंबेडकरांना भेटले. या भेटीत २१ व २२ मार्च १९२० ही तारीख निश्चित करण्यात आली. त्या परिषदेत शाहू महाराज म्हणाले, “तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढलात, याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत; इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते हिंदुस्थानचे पुढारी होतील.”
बाबासाहेबांनी अखिल भारतीय बहिष्कृत समाजाची पहिली परिषद ३० व ३१ मे १९२० रोजी नागपुरात भरवली. या परिषदेचे अध्यक्षस्थान शाहू महाराजांनी स्वीकारले होते. राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी दृष्टिकोन, त्यांचे द्रष्टेपण त्यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीतून दिसून येते. सामाजिक क्रांतीचे त्यांचे विचार एखाद्या दिपस्तंभाप्रमाणे आजही मार्गदर्शक ठरतील असेच आहेत.

- सुरेश पाटील, 
माहिती अधिकारी, उप माहिती कार्यालय, शिर्डी

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर

सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

मुंबई : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या दूरदृश्य बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला. कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा याविषयी महत्वाच्या सूचनाही केल्या. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका, ती तातडीने माझ्याकडे घेऊन या असेही त्यांनी निर्देश दिले.

पेरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा

राज्यातील पीकपाणी आणि पावसाबाबतही कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी माहिती दिली. राज्यात १३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून गेल्या वर्षी याच सुमारास २३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यात अजूनही समाधानकारक पाऊस नाही. विखुरलेल्या परिस्थितीत पाऊस पडत आहे. बियाणे खतांची उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण नाही. एक जुलै रोजी कृषी दिन आहे. त्याआधी २५ जून ते १ जुलै हा कृषी संजीवनी सप्ताहही आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये गावांगावामध्ये कृषी विस्तार व तंत्रज्ञान प्रसाराबाबत माहिती देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाची अनिश्चितता लक्षात घेता पेरण्या करण्याबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे सांगितले.

आपत्तीत यंत्रणांनी सतर्क राहावे

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबत देखील मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी आढावा घेतला . यावेळी विशेषतः कोकण विभागातील तयारी आणि सज्जता याबाबत कोकण विभागीय आयुक्त यांनी माहिती दिली. दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वेळीच देण्यात याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले. रत्नागिरी, महाड, खेड आणि चिपळूण परिसरांबाबत आतापासूनच विविध यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याची तसेच अतिवृष्टी आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क यंत्रणा सुरळीत राहावी यासाठी उपाययोजना, सॅटेलाईट- रेडीओ संपर्क यंत्रणा, तसेच मोबाईल चार्जिंगकरिताही व्यवस्था, पाटबंधारे विभागाची पाणी सोडण्याबाबत तसेच आपत्कालीन परिस्थितीत सायरनद्वारे सूचना देण्याची यंत्रणा, वापरण्यात येणाऱ्या बोटींची चाचणी याविषयी माहिती देण्यात आली.