कोरोना काळात रुग्णसेवा देणाऱ्या अधिपरिचारिकांना कामावरुन कमी करु नये - आ. जोरगेवार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : महाभयानक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कंत्राटी पध्दतीवर अधिपरिचारीकांची नियुक्ती करण्यात आली होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताच सदरहु कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यास सुरवात झाली आहे. मात्र कोरोनाची संभावीत तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सदरहु सर्व कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर कायम ठेवण्यात यावे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या आहे. सदरहु पत्रही त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना देण्यात आले आहे.
  
काही महिण्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही चांगलाच कहर घातला हाेता अनपेक्षित वाढत्या रुग्णसंख्येमूळे आरोग्य व्यवस्था तोकडी पडली हाेती. त्यामूळे कंत्राटी पध्दतीवर आरोग्य सेवक व सेविका तथा अधिपरिचारीकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानूसार जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत अधिपरिचारक व अधिपरिचारिकांच्या जागा भरण्यात आल्या होत्या. सदरहु अधिपरिचारिकांनी कोरोना महामारीच्या काळात स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवा केली. या कार्याबदल कोरोना योध्दा म्हणून त्यांचा सन्मानही करण्यात आला. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताच सदरहु कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्या जात आहे. संकटकाळात सेवा देणा-या कर्मचाऱ्यांवर हा अन्याय आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही तज्ञांमार्फत वर्तविण्यात येत आहे. अश्या परिस्थितीत सदरहु कर्मचाऱ्यांचा अनूभव कामी येणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता सर्व अधिपरिचारक व अधिपरिचारिकांना कामावरुन कमी न करता त्यांची सेवा वाढविण्यात यावी अश्या सुचना सदरहु पत्राच्या माध्यमातून आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहे.

महाराष्ट्र ट्रायबल आघाडी तर्फे संविधान दिवस कार्यक्रमाचे आयोजन

सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे

वणी : येथील कुवारा भिवंसन देवस्थान वणी पाण्याच्या टाकी जवळ दिनांक 26 नोव्हेंबर 2021 ला महाराष्ट्र ट्रायबल आघाडी च्या वतीने "संविधान दिवस" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी आदिवासी बांधवानी दुपारी साय.५ वाजता हजर राहण्याचे आवाहन महाराष्ट्र ट्रायबल आघाडी च्या तर्फे करण्यात आले आहे.

मागील दीड वर्षात कोरोना महामारी मुळे ज्या आदिवासी बांधवाना आपला जीव गमवावा त्या सर्वाना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असल्याचेही आयोजकांच्या वतीने सांगण्यात येते. तसेच "संविधान दिवस" व "शामादादा कोलाम" जयंती दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाजाच्या विकासासाठी संविधान जागृती करणे काळाची गरज ठरली आहे. या निमित्ताने महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राज्य अध्यक्ष मा. गीत घोष व राज्य उपाध्यक्ष मा.अॅड. संतोष भादिकर हे 'भारतीय संविधान व आदिवासी समाज' या विषयावर प्रबोधन करणार आहे. तरी सर्व समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. असे आयोजकांच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रातील बांधवाना आवाहन करण्यात आले.

अनुसूचित जमातीच्या युवकांना भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण आयोजित करा - आदिम शामादादा कोलाम संघटनेची मागणी


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

पांढरकवडा : राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक आदिवासी युवकांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना सन 2021-22 या सत्रासाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राळेगाव शामादादा कोलाम संघटनेच्या वतीने दिनांक 24 नोव्हेंबर ला पांढरकवडा एकात्मिक प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले.

महाराष्ट्र सरकार कडून मेगा पोलीस भरती होणार असून, त्या भरतीचा लाभ अनुसूचित जमातीच्या युवकांना व्हावा, सरकारी सेवेत जमातीच्या युवकांची संख्या वाढावी यासाठी प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

स्पर्धा परीक्षेच्या काळात स्पर्धा अधिक वेगवान होत आहे. या स्पर्धेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण असल्यास त्याचा लाभ या मेगा भरतीमध्ये होऊ शकतो. खाजगी प्रशिक्षण वर्गाचा खर्च आर्थिक बाजू कमकुवत असलेले अनुसूचित जमातींचे युवक करू शकत नाही. त्यामुळे लवकर भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजित करून जमातींच्या युवकांना न्याय द्यावा यासाठी एकात्मिक प्रकल्प अधिकारी पांढरकवडा यांना मागणी करण्यात आली.

यावेळी आदिम जमात शामादादा कोलाम संघटनेचे निलेश पिपरे, निलेश रोठे, अमित ढोबळे, समीर कोंडेकर, आकाश टेकाम, ज्ञानेश्वर मेश्राम, पिंटू जांभुळकर, स्वप्नील आत्राम, आकाश भि.टेकाम, सपना मेश्राम, आदींची उपस्थिती होती.

वणी ग्रामीण रुग्णालयात मनमानी कारभार, केवळ कापडं धुतली नाही म्हणून बाळंतिणीला केले रेफर

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पूर्णतः ढेपाळला असून अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांची हेळसांड होतांना दिसत आहे. रुग्णांना आवश्यक त्या सोई सुविधा पुरविण्यात वणीचे ग्रामीण रुग्णालय असमर्थ ठरू लागले आहे. या ठिकाणी रुग्णांची मोठी गैरसोय होत असून रुग्णांना सेवा पुरविण्यात डॉक्टर व नर्सेस हयगय करीत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. उपचाराची जराही हमी न घेता सरळ रुग्णांना इतरत्र हलविण्याचे फर्मान सोडले जात असल्याने येथील ग्रामीण रुग्णालय हे रेफर करणारे रुग्णालय म्हणून नावारूपास येऊ लागले आहे. आता तर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सूडबुद्धीने रुग्णांना रेफर करू लागल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहे. बाळंतपणासाठी लागणारी कापडं धुतली नाही म्हणून एका बाळंतिणीला येथील डॉक्टरांनी चंद्रपूरला रेफर केल्याचा लाजिरवाणा प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या खेद जनक प्रकरणाची त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. वणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रुग्णसेवेचे व्रण घेतलेले वैद्यकीय अधिकारीच बेजवाबदारपणे वागत असल्याचे अनेक प्रकरणं समोर आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासंदर्भात राजू तुराणकर यांनी २७ सप्टेंबरला जिल्हा शल्य चिकित्सकांना लेखी पत्र पाठविले होते. त्यावर त्यांनी ग्रामीण रुग्णालयात सर्वांसमक्ष बैठक लावून रुग्णालय परिस्थीचा आढावा घेऊन परिस्थिती सुधारण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आजही रुग्णालयातील परिस्थिती जैसे थे च आहे. सोई सुविधांच्या अभावाबरोबरच आरोग्य तपासणी यंत्रांचा अभाव व आवश्यक त्या औषधांचाही अभाव ग्रामीण रुग्णालयात नेहमी दिसून येतो. रॅबिजच्या इजेक्शनचाही नेहमी तुटवडाच राहतो. ऍसिडिटीचे इंजेक्शन उपलब्ध रहात नाही. ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत रुग्णांचा नेहमी तक्रारींचा पाढाच असतो. ग्रामीण रुग्णालय सर्वच बाबतीत सुसज्ज व्हावे, याकरिता कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. रुग्णालयाचा दर्जा सुधारण्याकरिता थातुरमातुर आंदोलने केली जातात, मग सगळं काही वेल सेट झालं की, मूक दर्शक बनून राहतात. रुग्णांचा कळवळाही जारकीय हेतू साध्य करण्यासाठीच दाखविला जातो. नंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची किती गैरसोय होते, याकडे कुणीच लक्ष द्यायला तयार नसतं. बाळंतिणीच्या बाबतीत घडलेला हा प्रकार अतिशय घृणास्पद असून या प्रकाराची चौकशी न झाल्यास शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

तालुक्यातील वारगाव येथील रंजना नितेश कोल्हे ही महिला प्रसूतीची वेळ आल्याने ग्रामीण रुग्णालयात भरती झाली. दोन दिवसांपासून भरती असलेल्या या महिलेला केवळ बाळंतपणासाठी लागणारी कापडं धुवून नसल्याने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. ही बाब २३ नोव्हेंबरला राजू तुराणकर यांच्या लक्षात आली. त्यांनी या माणुसकीहीन प्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार देखील केली. तसेच आरोग्य संचालक व उपायुक्त यांनाही फोन करून हा प्रकार सांगितला. या खेद जनक प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही न केल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी दिला आहे.

पुरोगामी साहित्य संसद तथा पत्रकार संघाच्या वतीने चंद्रपूरात पार पडली काव्य स्पर

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : लयास चाललेली वाचन आणि लेखन संस्कृती कायम राहावी तदवतचं नव्या दमाचे कवी तथा साहित्यिक निर्माण व्हावे या हेतूने पुरोगामी साहित्य संसद जिल्हा चंद्रपूर आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हास्तरिय आंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाेते "देशाची शान,भारतीय संविधान" असा या काव्य स्पर्धेचा विषय होता.दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातुन ४० महाविद्यालयिन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आयोजित या स्पर्धेत आपला सहभाग नाेंदविला दि.२४ नोव्हेंबरला श्रमिक पत्रकार भवन,(वरोरा नाका) चंद्रपूर येथे या काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
      
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध अधिवक्ते एड.राजेश सिंग होते.तर कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्य संसदेचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर यांच्या हस्ते करण्यात आले,पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे,पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हाध्यक्ष एड.योगिता रायपुरे,कार्याध्यक्ष विजय भासारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, थोर विचारवंत,जेष्ठ पत्रकार प्रबोधनकार ठाकरे,साहित्यिक,पत्रकार आचार्य अत्रे,वरिष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. 
      
प्रथम,द्वितीय,तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना ३ हजार,२ हजार,१ हजार रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह,व प्रशिस्ती पत्रक देण्यात आले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवाजी महाविद्यालयातील सुरज पचारे यांनी,दुसरा क्रमांक सर्वोदय महाविद्यालय गोंडपीपरी यांनी,तर तिसरा क्रमांक चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी आलम हिने पटकावला.प्रोत्साहन पर पुरस्कार शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्रतीक्षा वासनिक या विद्यार्थीनीला देण्यात आले.       
यावेळी परीक्षक म्हणून नरेशकुमार बोरीकर, विजय वाटेवर,प्रदीप देशमुख,मधुकर दुफारे यांनी उत्तमरित्या जबाबदारी पार पाडली.स्पर्धेत नरेंद्र सोनारकर,विजय भासारकर एड.योगिता रायपुरे,मृणाल कांबळे,नरेशकुमार बोरीकर,पवन भगत,सविता भोयर,हेमा लांजेवार,संगीता घोडेस्वार, इत्यादींनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या.
       
कार्यक्रमाचे संचालन सीमा भासारकर यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार मृणाल कांबळे यांनी मानले.
कार्यक्रमाला स्पर्धकांसह कवी व रसिक उपस्थित होते.