वाटाघाटीसाठी काँग्रेसने नेमली समन्वय समिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात लोकसभेला काँग्रेस पक्षाला तब्बल १३ जागांवर विजय मिळाला. २०१९ मधील १ जागेवरून काँग्रेसने यावेळी १३ जागा मिळविल्या त्यामुळे पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यात नाना पटोले यांना यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वात लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या निवडणुका महाविकास आघाडीतून लढविल्या जाणार आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वाटाघाटी होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने समन्वयासाठी १० जणांची समिती नेमली आहे. यात मुंबईसाठी या समितीत ३ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने १० सदस्यांची समिती गठीत केली. यामध्ये राज्यातील जागावाटपासाठी ७ जणांची तर मुंबईसाठी तिघांना स्थान देण्यात आले. 

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी हे नेते पुढाकार घेणार आहेत. यामध्ये जुन्या व वरिष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांत महाविकास आघाडीत प्रदेश जागा वाटपांच्या चर्चेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नितीन राऊत यांना स्थान देण्यात आले तर मुंबईच्या जागा वाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश करण्यात आला.