मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांचे तूर्तास उपोषण मागे


सह्याद्री चौफेर | वृत्ससंस्था 

मारेगाव : 23 जुलैपासुन पांदण रस्त्या साठी पाथरी परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. शेतात जाण्यासाठी शेतकऱ्याना पांदण रस्त्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्याना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी शासनाने मातोश्री पांदण रस्ते विकास योजना अमलात आणली आहे. मात्र, मंजुर पांदण रस्त्याची समस्या निकाली काढण्यास कमालीची दिरंगाई होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी पावसाळ्यात कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या पांदण रस्त्यावरुन ये-जा करतांना शेतकरी त्रस्त झालाआहे. त्यामुळे पाथरी परीसरातील शेतकऱ्यानी पांदण रस्ता तत्काळ व्हावा यासाठी मार्डी ते मारेगाव या मार्गावरील पाथरी फाट्यावर आमरण उपोषण सुरु केले होते. 
तालुक्यात दोन तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरु असताना 24 जुलै उपोषणाचा दुसरा दिवस होता. शेतकऱ्यांनी उपोषण सोडावे यासाठी स्थानिक प्रशासनाचा कालपासूनच प्रयत्न सुरु होता. मात्र, काम सुरु होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम होते. भर रस्त्याच्या कडेला सोयी सुविधा नसलेल्या ठिकाणी या शेतकऱ्याचे उपोषण सुरु होते. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवल्यामुळे,तहसिलदार उत्तम निलावाड,मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास ओचावार, मंडळ अधिकारी अमोल घुगाणे, यांनी उपोषण कर्त्याची समजुत काढुन तात्पुरर्त्या स्वरुपाचा रस्ता मोकळा करुन दिला आहे. पाऊस संपला की, योजनेअंतर्गत कामाचा शुभारंभ केला जाईल असे, आश्वासन देण्यात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देवुन हे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे.