वन विभाग ऍक्शन मोडवर...अवैद्यरित्या जंगल क्षेत्रातुन वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : उन्हाच्या कडाक्याला न जुमानता तस्कर नदी नाले पिंजून काढत वाळू ची जमेल त्या वेळी अवैधपणे उपसा करित आहे. अशातच आज बुधवारी सकाळी वन परिक्षेत्रांतर्गत केगाव बिट मधील कक्ष क्र. (सि. 55 बी) मधील निर्गुळा नदीपात्रातून अवैधरित्या ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून वाहतूक करताना वन विभागाच्या टीमने एका ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई केली आहे. 

मारेगाव तालुक्यातील रेती घाट तस्कराकडून फस्त करणे हे काही नवीन नाही. मालामाल होण्याच्या नादात वाटेल तेथून सकाळी दुपारी सायंकाळी व मध्यरात्री वाळूचा उपसा केल्या जात आहे. महसूल विभाग सतत ह्यांचे कंबरडे मोडत असताना आता वन विभागही ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. 

मारेगांव वनपरिक्षेत्रातील मारेगाव वर्तळातील नियतक्षेत्र केगांव अंतर्गत कक्ष क्र. C55B मध्ये सामुहिकरित्या गस्त करित असतांना जंगल क्षेत्रातुन वाहणाऱ्या निर्गुळा नदीपात्रातून अवैद्यरित्या जंगल मार्गाने रेती वाहतुक होत असल्याच्या संशय आल्यामुळे नदी काठाने गस्ती दरम्यान एक टॅक्टर निर्गुळा नदी पात्रातील वाळु जंगल मार्गाने वाहतुक करित असल्याचे दिसुन आले. सदर टॅक्टर वाहकाने वनविभागाचे पथक त्याच्याकडे येत असल्याचे पाहुन तिथुन पळ काढला, त्यामुळे सदर टॅक्टरचा पाठलाग करून त्याला केगांव गांवामध्ये पकडुन त्यावर भारतीय वन अधिनियम 1927 अंर्तगत कार्यवाही केली व पुढील चौकशीकरीता टॅक्टर मारेगांव वनविभाग कार्यालयामध्ये जमा केले.  

विशेष म्हणजे उपसा करित असलेल्या ठिकाणाहून ट्रॅक्टरसह पळ काढत असताना एखाद्या चित्रपटाला शोभेल असा त्यांचा पाठलाग करून केगाव येथे अखेर सकाळी 9 वाजता वाळू भरलेले किमान एक ते सव्वा ब्रास असलेल्या ट्रॅक्टर क्र. (एम एच 34 ए पी 2588) ह्या वाहनाचा पंचनामा करून मारेगाव येथे वन विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आले अशी माहिती आहे. 

सदरची कार्यवाही शंकर हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे.) मारेगांव यांचे समक्ष दिनेश पोयाम क्षेत्रसहाय्यक मारेगांव, मोहन टोंगे क्षेत्रसहाय्यक वडकी व मोनाली मडावी वनरक्षक केगांव बिट यांनी केली.

वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांचे आवाहन :
मारेगांव वनरिक्षेत्रातील लोकांना आवाहन करण्यात येते कि, जंगल क्षेत्रामध्ये विना परवाना कोणीही प्रवेश करु नये, जंगल क्षेत्रातील झांडांची तोड करु नये, जंगल क्षेत्रामध्ये आग लावु नये तसेच तेंदु पाने, मोहफुले वेचण्याकरिता एकटे जंगल क्षेत्रामध्ये जावु नये तसेच मानव वन्यजीव संघर्ष घडेल असे कुठलेही कृत्य करु नये.