...तर शेतकरी व कामगारांची उन्नती झाली असती,मेंढोली येथे भीमजयंती कार्यक्रमात मान्यवरांचा सुर


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर जयंती निमित्त मेंढोली येथे उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान सकाळी गावकऱ्यांनी 11 वाजता बाबासाहेबांचा जयजयकार करीत रॅली काढली,त्यानंतर सभा घेण्यात आली.

सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुमार मोहरमपुरी व अ‍ॅड. दिलीप परचाके होते तर अध्यक्षस्थानी नारायण गोडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच विनायकराव ढवस, नगराळे साहेब, मनोज काळे, हेमंत ऐकरे, नंदकिशोर बोबडे हे उपस्थित होते.

भारतीय संविधान तयार करण्याचे काम घटना समितीला सोपविण्याचे निश्चित झाल्यानंतर अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडारेशनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानासंदर्भात एक प्रस्ताव/निवेदन सादर केले होते ह्या निवेदनात मूलभूत हक्क, अल्पसंख्यांकचे अधिकार, अस्पृश्यांच्या संरक्षणाविषयी तरतुदी ह्या नमूद होत्या. अनुच्छेद दोन, भाग दोन, खंड चार मध्ये आर्थिक शोषणा विरुद्ध संरक्षण मध्ये राज्य समाजवादाची मांडणी केली व संविधानामध्ये ती संविधानाचा मुळ पाया असली पाहिजे व त्याला येणाऱ्या कोणत्याही शासकाला त्यामध्ये फेरबादल करण्याचा अधिकार नसेल ज्यामुळे कोणत्याही शेतकरी व कामगाराचे कधीही शोषण होणार नाही. परंतु प्रत्यक्षात संविधान लिहीत असताना संविधान सभेने त्यांची ही मांडणी स्वीकारली नसल्याने बाबासाहेबांनी संविधान अर्पण करताना इशारा दिला कि, राजकीय स्वातंत्र्यासोबत सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्या न दिल्याने पुढील काळात पीडित जनता मोठ्या श्रमाने निर्माण केलेली संसदीय लोकशाही उधळून लावतील. आज बाबासाहेबांचा राज्य समाजवाद अस्तित्वात न आल्याने आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढली असून भूखमरीत देशाचा क्रमांक 142 व्या स्थानी आहे. सुशिक्षित बेरोजगारांची टक्केवारी 83 टक्के आहे. देशाची व्यवस्था बरबादीचा उंबरठ्यावर असून ह्याचा उद्रेक कधीही होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. गेल्या 10 वर्षात परिस्थिती अधिक बिकट झाल्याचे चित्र समोर दिसते आहे. बाबासाहेबांची जयंती साजरी करीत असताना बाबासाहेबांचा ईशारऱ्याकडे लक्ष देऊन पुढील वाटचाल करावी लागेल, असे या कार्यक्रमात कुमार मोहरमपुरी व अ‍ॅड. दिलीप परचाके यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सुर काढला. 

भीमजयंती निमित्ताने झालेल्या सभेचे संचालन सुधाकर तुराणकर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजक जयप्रकाश तेलंग, एकनाथ नालमवार, बुद्धिजम तेलंग, ऋषीं कुळमेथे, संजय वालकोंडे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गावातील अनेक स्त्री पुरुष उपस्थित होते.