लिंबू ही जगाला भारताने दिलेली देणगी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

उन्हाळा आला, आरोग्य सांभाळा हा सल्ला आता सर्वांनाच देण्याची वेळ आली आहे. उन्हाळा म्हटले कि सर्वप्रथम आठवण येते ती शरीर आणि मनाला ताजगी देणाऱ्या लिंबू सरबताची. उन्हाळा आला कि लिंबाचे दर वाढू लागतात पण तरीही तापत्या उन्ह्यातून आल्यावर थंडगार लिंबू सरबत हे अनेकांचे आवडते पेय असते. सायट्रस कुळातील हे फळ अतिशय उपयुक्त असून आरोग्यदायी आहे. ताजेपणा देणारे, तोंडाची रुची वाढविणारे, आजारपण दूर करणारे हे करामती लिंबू मूळचे भारतीयच आहे. 

हडप्पा येथे केलेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषात लिंबू पाने याचा उपयोग दिलेला आढळला आहे. प्राचीन काळात भारतात लिंबाचा वापर केला जात होता याचे अनेक पुरावे आहेत. लिंबू ही जगाला भारताने दिलेली देणगी आहे. प्राचीन काळात पाण्यात मिसळून लिंबू सेवन केले जात असे त्यामुळे वेगळीच उर्जा, वेगळी चव मिळत असे असे उल्लेख येतात. म्यानमार आणि चीन मध्येही लिंबू प्राचीन काळापासून वापरले जात आहे. मोंगल काळात जे प्रवासी आले त्यांनी त्यांच्या प्रवासवर्णनात लिंबाचा उल्लेख केलेला आढळतो. बादशहा बाबर यांच्या सरदाराने म्हणजे अमीर खुस्रो यांनी लिहिलेल्या ग्रंथात लिंबाचे उल्लेख आहेत. चरक संहितेत लिंबाचे उपयोग नोंदले गेले आहेत तर विजयनगर राज्यात १६ व्या शतकात आलेल्या परदेशी प्रवाशांची नजर लिंबाच्या झाडांवर पडल्याचे उल्लेख येतात. लिंबाचे एक विशेष म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी अश्या कुठल्याही पदार्थात याचा वापर होतो. सरबतापासून सोडा, मद्य यात लिंबाचा झणझणीत स्वाद हवाच. शिकंजी मध्ये लिंबू हवेच.

लिंबाचे औषधी उपयोग अनेक आहेत. पचन व्यवस्थित होण्यासाठी लिंबू उपयुक्त आहेच पण तोंडाची रुची वाढविण्यासाठी लिंबू लोणचे फार उपयुक्त ठरते. लिंबामध्ये ए, बी, सी जीवनसत्व आहेत त्याचबरोबर पोटेशियम, मंगनीज, आयर्न, तांबे, फॉस्फरस अशी अनेक क्षार आहेत. प्रोटीन आणि कर्बोदके सुद्धा आहेत. सर्दी, रक्तक्षय, पचन विकार, उष्णता शमन अश्या अनेक आजारात लिंबाचे सेवन फायद्याचे ठरते. लिंबू शुक्राणू मारते, इतकेच काय पण एचआयव्ही विषाणू सुद्धा मारते त्यामुळे याचा वापर गर्भनिरोधक म्हणून सुद्धा केला जातो. ऑस्ट्रेलियन संशोधकाने लिंबातील हे गुण शोधून काढल्याचे सांगतात.