विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

सह्याद्री चौफेर | न्यूज 

आपल्या भारदस्त अभिनयानं तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. काल त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं. पण विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

मागच्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या पोटात पाणी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

विक्रम गोखले नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी त्याच्या भारदस्त अभिनयानं सिनेमाला चार चांद लावले. 'लागलं का पाणी मारूतीच्या पायाला' संपूर्ण सिनेमात त्यांच्या तोंडी हे एकच वाक्य ऐकायला मिळतं. पण ते एक वाक्य विक्रम गोखले यांनी ज्या पद्धतीनं सादर केलं आहे त्याला तोड नाही. 

विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 साली पुण्यात झाला. सिनेमा, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांची काम केलं आहे. अभिनयाबरोबरचं त्यांनी लेखन, दिग्दर्शन देखील केलं आहे. अनेक सिनेमांच्या समीक्षण ते करत होते. सध्या ते नवोदित कलाकारांना अभिनयाचं प्रशिक्षण देत होते. 'एखादी तरी स्मितरेषा', 'खरं सांगायचं तर', 'जावई माझा भला', 'बॅरिस्टर', 'सरगम', 'स्वामी' ही त्यांची प्रसिद्ध नाटकं होती. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचं मोलाचं योगदान आहे. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.