सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वणी उपविभागात मोठी राजकीय उलथापालथ घडली असून काँग्रेस व उबाठा गटातील ११ प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. मुंबई येथील ‘नंदनवन’ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांचेही मार्गदर्शन लाभले.
वणी उपविभागातील विविध स्तरांवर कार्यरत असलेले काँग्रेस चे गजानन किन्हेकर, आशिष खुलसंगे, उबाठाचे दीपक कोकास, अजिंक्य शेंडे, राजू तुराणकर यांच्यासह इतर दिग्गजांनी ‘धनुष्यबाण’ हाती घेतल्याने स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस व उबाठा गटातील काही माजी पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच तसेच युवा नेत्यांचा या प्रवेशात समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पक्षांतर्गत अस्वस्थता आणि मतभेद वाढत असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर या नेत्यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणी उपविभागातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

