मोठी बातमी: 13 ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता? 'असा' असणार 44 दिवसांचा प्रोग्राम..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

विधानसभेची निवडणूक वेळेत होवून २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरिता १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. ८) कॅबिनेट बोलावण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते..

दरम्यान, मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या सलग दोन दिवस बैठका पार पडल्या असून आता आज पुन्हा कॅबिनेट बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सोमवारी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून या कॅबिनेटमध्ये १०० हून अधिक विषय ठेवले जाणार आहेत.

दरम्यान, या कॅबिनेटमध्ये आणखी कोणत्या योजनांची घोषणा होणार, कोणत्या घटकांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १३ ऑक्टोबरला आचारसंहिता जाहीर झाल्यास बरोबर दिवाळीनंतर मतदान होईल आणि २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार सत्तेत येवू शकेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सागितले. या पार्श्वभूमीवर सध्या मंत्रालयातील हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे.

निवडणुकीसाठी साधारणत: लागतात ३५ दिवस
राज्याचे नवीन सरकार २६ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण तयारी झाली असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत साधारणपणे ३० ते ३५ दिवस लागतात.

असा असणार प्रोग्राम
• आचारसंहितेनंतर तयारी : ५ ते ६ दिवस
• उमेदवारी अर्ज भरणे : ७ दिवस
• छाननी व अंतिम यादी : १ दिवस
• अर्ज माघार : २ दिवस
• प्रचारासाठी दिवस : १२ ते १५ दिवस
• मतदान व निकाल : ३ ते ४ दिवस
• सरकार स्थापनेसाठी अवधी : १० ते १२ दिवस