विकास ग्रुप व कवितेचे घर शेगांव (बु) यांच्या वतीने डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

 वरोरा : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर्व संमतीने ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड झाल्याबद्दल विकास ग्रुप व कवितेचे घर, शेगांव (बु ) यांच्या वतीने सन्मानचिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. 
     
याप्रसंगी विकास ग्रुपचे समन्वयक व कवितेच्या घराचे संकल्पनाकार किशोर पेटकर, कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, विकास ग्रुपचे सदस्य नितीन वैद्य, नागपूर येथील निवृत प्राचार्य श्रावण सूरंशे, शार्दुल पेटकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
    
सत्कार प्रसंगी बोलताना प्रा. प्रमोद नारायणे म्हणाले, डॉ. रवींद्र शोभणे यांच्या रूपाने विदर्भाच्या मातीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार व कथाकार मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला मिळालेला आहे. त्यांच्या सर्वच कादंबऱ्या लक्षवेधी आहे. त्यांनी आपल्या कादंबऱ्यामधून सामाजिक वास्तवाबरोबरच राजकीय व्यवस्थेवर भाष्य केले आहे. त्यांच्या कथांना ग्रामीणतेचा स्पर्श झालेला आहे आणि शहरातील घुसमटही या कथा प्रभावीपणे मांडत आहेत. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या निवडीमुळे साहित्य सेवा करणारा योग्य साहित्यिक संमेलनाला अध्यक्ष म्हणून मिळाला असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांचे साहित्य उत्तरोत्तर बहरत जावो अशा सदिच्छा सुद्धा त्यांनी विकास ग्रुप व कवितेचे घर शेगांव ( बु ) यांच्या वतीने व्यक्त केल्या.
 
किशोर पेटकर म्हणाले, डॉ. रवींद्र शोभणे यांच्या कथा आम्ही विविध वृतपत्रातून आणि मासिकांमधून वाचत असतो. त्यांच्या कथांनी मानवी जीवनाचे विविध कंगोरे मांडलेले आहेत. समाजातील विसंगती त्यांनी साहित्यातून टिपलेली आहे. त्यांचे साहित्य म्हणजे घटना प्रसंगांची फक्त गुंफणच नाही, तर वाचकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे मूल्यद्रव्य होय. त्यामुळे डॉ. शोभणे यांच्या साहित्याची मौलिकता अपार आहे असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य श्रावण सुरंशे यांनी डॉ. रवींद्र शोभणे यांच्यांशी त्यांच्या साहित्याच्या अनुषंगाने संवाद साधताना उत्तरायण, पडघम, पांढर आणि होळी या कांदबऱ्यांच्या निर्मिती प्रकियेविषयी व त्यातील कथासूत्राविषयी विविध प्रश्न विचारले.
     
डॉ. रवींद्र शोभणे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, जीवनातील अघटित घटणारी घटना ही माझ्या मनाला चटका देऊन जाते आणि त्याला साहित्य रूप देण्याचा मी प्रयत्न करतो, त्यातून माझ्या कथा साकार होतात. कादंबरीसारखा साहित्य प्रकार लिहिताना बराच अवधी द्यावा लागतो. चिंतन करावे लागते. जीवनाचे योग्य रितीने आकलन व्हावे लागते, उत्तरायण ही कादंबरी लिहायला मला दहा वर्षे लागली, या कादंबरीतील पौराणिक पात्रांना समजून घेऊन त्यांना मानुष पातळीवर आणण्याची मी धडपड केली. पडघम कांदबरी बऱ्याच वर्षांने आली. त्यामुळे साहित्य लेखनासाठी लेखकाला असे स्वतःत मुरवावे लागते असे सांगून त्यांनी यथोचित सत्कार केल्याबद्दल विकास ग्रुपचे व कवितेच्या घराचे आभार मानले व अध्यक्षपदाला योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले. संचालन नितीन वैद्य यांनी तर आभार शार्दुल पेटकर यांनी केले.
विकास ग्रुप व कवितेचे घर शेगांव (बु) यांच्या वतीने डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार विकास ग्रुप व कवितेचे घर शेगांव (बु) यांच्या वतीने डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on July 02, 2023 Rating: 5
Powered by Blogger.