सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
गेल्या महिन्यापासून राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे नुकसान झाले होते. यातून जी पिके वाचली ती पिके आता सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे खराब झाली आहेत.
अशातच शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा चिंतेची बातमी समोर येत आहे. खरं पाहता सध्या राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे आणि 19 ते 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. सोबतच डखं यांनी पुढल्या महिन्यात देखील अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 18, 19, 20 एप्रिल दरम्यान पुन्हा अवकाळी पाऊस पडेल. वास्तविक हवामान विभागाने 17 एप्रिल नंतर राज्यात पावसाची उघडीप राहील असं सांगितले आहे. पण डख यांनी 20 एप्रिल पर्यंत राज्यात पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
विशेष बाब म्हणजे मे महिन्यात देखील एप्रिल प्रमाणेच पाऊस कोसळणार असल्याचे चित्र आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे मे महिन्यात पहिल्या आठवड्याच्या शेवटी मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच 15 मे नंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. हा पाऊस कुठे आणि कोणत्या जिल्ह्यात पडेल याबाबत अद्याप पंजाबरावांनी कोणतीच माहिती दिलेली नाही.
मात्र,येत्या काही दिवसात लवकरच याबाबत पंजाबराव माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत पुढल्या महिन्यातही पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब असून शेतकऱ्यांना निश्चितच या गोष्टीची काळजी घेऊन आपल्या शेती पिकांचे संरक्षण या ठिकाणी करावे लागणार आहे.