(संग्रहित फोटो)
बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
लातूर : लातूर जिल्ह्यातील तुळशिराम तांडा ता.अहमदपूर येथे एका तलावात पाच ऊसतोड कामगार महिलांचा मृत्यु झालेल्या घटनेबद्दल लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत आणि सहकार्य करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
अहमदपुर तालुक्यातील तुळशिराम तांडा येथे तलावात कपडे धुण्यासाठी राधाबाई धोंडीबा आडे (४५), दीक्षा धोंडिबा आडे (२१), काजल धोंडिबा आडे (१९), सर्व रा. रामापूर तांडा, तालुका पालम जिल्हा परभणी व सुषमा संजय राठोड (२२), अरुणा गंगाधर राठोड (२६), रा मोजमाबाद तांडा ता.पालम . जि. परभणी येथील या ऊसतोड महिला कामगार गेले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे.एकाच वेळी पाच महिलांचा मृत्यु झाल्याची ही घटना अत्यंत दुर्देवी आणि दुःखदायक आहे असे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
मृत महिलांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करुन पालकमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
या दुर्देवी घटनेत मृत्यु पावलेल्या महिलांच्या कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाने तातडीची मदत आणि सहकार्य करावे,असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.