2019 पासून राज्यातील जिल्हा परिषदांची स्थगिती असलेली भरती प्रक्रिया सुरू करा


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्त असलेल्या पदांची जाहिरात मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार रिक्त असलेल्या 13521 विविध पदासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते दरम्यानच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भरती प्रक्रिया लांबणीवर गेली राज्यातील सरकारने कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणीमुळे नोकर भरतीवर स्थगिती लागली परंतु कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेवर ताण असल्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्यातील पदे भरण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील पाच प्रकारच्या पदभरती साठी मंजुरी देण्यात आली होती. ही पदे आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ याप्रमाणे होती. या पदांच्या परीक्षांचे नियोजन ऑगस्ट 2021 मध्ये करण्यात आले होते परंतु दोन वेळा परीक्षांच्या तारखा जाहीर करून परीक्षा पुढे ढकलण्यात आले परंतु आरोग्य विभाग परीक्षेतील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर या परीक्षांचे भविष्य अंधातरी लटकले आहे.

राज्यातील जिल्हा परिषदेमधील 13521 जागेसाठी मार्च 2019 मध्ये 12 लाखावर विविध पदासाठी अर्ज आले. एका उमेदवाराने ते दोन ते तीन हजार रुपये खर्च करून विविध पदासाठी अर्ज केलेत. वर्षभरापासून विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याने, जिल्हा परिषदेचेही पदभरती होईल अशी अपेक्षा उमेदवारांना होती मात्र सरकारकडून कुठलीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष वाढला आहे.

राज्यात झालेल्या नुकत्याच परीक्षेत अनेक घोटाळे, बनावट उमेदवारांना पकडण्यात आले. आता जिल्हा परिषदेच्या विविध पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या लाखोंच्या घरात आहे त्यामुळे परीक्षेत पुन्हा गोंधळ होऊ नये यासाठी परीक्षा केंद्रावर मोबाईल जॅमर, अंग तपासणी यंत्र बंधनकारक करावे.

 येत्या पंधरा दिवसात परीक्षेची तारीख जाहीर करावी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा. अशा प्रकारचे निवेदन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे सिद्धांत पुणेकर, राहुल वनकर, सुरज खोब्रागडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.