सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक रस्त्यांची कामे मंजूर असून सुध्दा कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कामामध्ये सातत्याने दिरंगाई होत आहे.
पेट्रोल पंप चौक ते माणिकगड गेट या रस्त्याचे काम सुरू व्हावे म्हणून प्रहारचे सतीश बिडकर यांचे नेतृत्वात मध्यंतरी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान गेल्या वर्षभरापासून रस्ता खोदून ठेवला असून काम ठप्प होते. यावर स्थानिक आमदार यांनी वर्षभरात कधीच लक्ष पुरविले नाही. दरम्यान प्रहारने सार्वजनिक बांधकाम विभागाशी सदैव या बाबत पाठपुरावा केला. त्या संदर्भातील पत्र व्यवहार देखील उपलब्ध आहे. दोन दिवसांआधी गडचांदूर येथील माणिकगड चौक ते संत जगनाडे महाराज चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रहारने केलेल्या पाठपुराव्यामुळेच काम सुरू झाले आहे. (प्रहार ने यासाठी केले होते आंदोलन)
तसे सार्वजनिक बांधकाम विभागाने एका पत्राद्वारे प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांना कळिवले आहे. परंतु या कामाचे श्रेय घेण्यासाठी स्थानिक आमदार सरसावले की काय असा प्रश्न प्रहारने या निमित्ताने उपस्थित केला आहे. वर्षभर गप्प असणारे नेते ऐन काम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी काम सुरू करण्याचा इशारा देतात आणि काम सुरू झाले म्हणून पेपरबाजी करतात हे दुर्दैवच म्हणावे लागेल .याच रस्त्यावर वर्षभरात अनेकांचे अपघात झाले. त्या वेळी कुणीच या कडे लक्ष पुरविले नाही. लोकप्रतिनिधी, कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने कामास विलंब झाला हे येथील जनतेत बाेलल्या जाते. प्रहारच्या प्रयत्नातुन व आंदोलनाच्या माध्यमांतुन आता काम सुरू झाले आहे असे सतिश बिडकर यांनी बाेलतांना सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी व लोकप्रतिनिधींनी आता सतत कामांवर लक्ष ठेवावे. दर्जाहीन कामे झाल्यास त्यांना जबाबदार धरुन आंदोलन करण्याचा इशारा या वेळी प्रहार पक्षाने दिला आहे.