राष्ट्रबांधणी युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण - डॉ. राजेश बुरंगे

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

वणी : राष्ट्रीय सेवा योजना हे विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करणारे वैशिष्ट्यपूर्ण व्यासपीठ आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतून तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात दिलेले योगदानामुळे राष्ट्राच्या बांधणीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे.

भारतासारख्या जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात आपण सगळ्यांनी मतदान यादीत आपले नाव आवर्जून नोंदवावे आणि मतदानाच्या माध्यमातून आपले राष्ट्रीय कर्तव्य निश्चितपणे निभवावे असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेश बुरंगे यांनी केले.
    
शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या द्वारे लोकशाही पंधरवडा च्या अंतर्गत विद्यापीठ स्तरीय आभासी वेबिनार मध्ये, राष्ट्रीय बांधणीत नवमतदारांची भूमिका, या विषयावर ते आपले मत व्यक्त करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे उपस्थित होते.
     
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ निलिमा दवणे यांनी या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध, पोस्टर, रांगोळी इत्यादी स्पर्धांची तथा राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
    
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून ते केवळ आपणच नव्हे तर आपल्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे यासाठी स्वयंसेवकांनी त्यांना प्रेरणा देत, जनप्रबोधन करावे असे आवाहन अध्यक्ष डॉ. प्रसाद खानझोडे यांनी केले.
     
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी किसन घोगरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. निलिमा दवणे यांनी केले.