लोकमान्य टिळक महाविद्यालय चा अभिनव उपक्रम एक पहल शिक्षा की ओर !


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : covid-19 च्या जागतिक संकटाने प्रचंड क्षतिग्रस्त झालेल्या शिक्षण क्षेत्रात फार मूलभूत कामाची आवश्यकता आहे हे लक्षात घेवून, या काळात शाळा आणि प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित राहिलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वी किमान आवश्यक गोष्टी शिकवाव्या भूमिकेने लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग द्वारे एक पहल शिक्षा की ओर ! हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
     
वणीच्या गोकुळ नगर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना १० ते १६ फेब्रुवारी या काळात जत्रा रोडवरील हनुमान मंदिरात आयोजित या कार्यशाळेत तब्बल ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला हे विशेष.
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ईच-वन-टीच-वन या स्वरूपात या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख, अंक ओळख, प्राथमिक गणित यासह विविध मूल्यशिक्षण विषय गोष्टी शिकविल्या. 
   
समाजातील विविध मान्यवरांकडून रोज या विद्यार्थ्यांना विविध खाद्य पदार्थांचे तथा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. उपक्रमात सहभागी विद्यार्थी शिक्षकांनी अनेक विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तू वाटल्या हे विशेष उल्लेखनीय.
    
कार्यक्रमाचे उद्घाटक आणि समारोपीय मार्गदर्शक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनंदा अस्वले यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अशा उपक्रमांची अनिवार्यता अधोरेखित करून उपक्रम संपन्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. समारोप सत्रात हनुमान मंदिर संस्थान चे अध्यक्ष सोमनाथ मदान तथा पालक प्रतिनिधी उमेश शिंदे विशेषत्वाने उपस्थित होते.
आमच्या शाळेपेक्षाही इथे आम्हाला जास्त आवडले ही सहभागी विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया उपक्रमाचा सगळ्यात मोठा गौरव होय.
   
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. कुणाल वनकर, प्रा भाग्यश्री गथबे, श्वेता राऊत, अमित काळे, जयंत व्यवहारे, राजू आगलावे,रामराव आडे यांनी विशेष परिश्रम घेतले.