आदिवासी युवकांना मारहाण प्रकरणी वनविभागाने खोटे बयान तयार केले !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : ताडोबा बफर क्षेत्र झोन अंतर्गत येणा-या फुलझरी डोनी या गावातील आदिवासी युवकांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर मारझोड करून खोट्या स्वाक्षऱ्या कोऱ्या कागदावर घेतल्या. आम्हाला व राजु झोडे यांना खोट्या गुन्ह्यात फसविण्याचा वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांचा प्रयत्न असून आम्ही निर्दोष असताना दडपशाही करून वन विभाग आपल्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीपाेटी आम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्नात आहेत असा खुलासा पत्रकार परिषदेत अन्यायग्रस्त आदिवासी युवकांनी आज केला.
  
आशिष नैताम, मनोज मरापे, रुपेश नैताम, रंजीत सोयाम ताडोबा बफर झोन क्षेत्र असलेल्या फुलझरी व डोनी येथील आदिवासी युवक असून काही कामानिमित्त ते डोनी येथे दुचाकीने जात असताना त्यांची दुचाकी रस्त्यात खराब झाली. त्यांच्या मागे अरुण मरापे व रणजित सोयाम हे दुचाकीने मागे आले. त्यानंतर भारत कोवे तुमच्या सोबत मी डोनीला येत नाही म्हणून पैदल फुलझरी जायला निघाला व वाटेतच त्याला वाघाने हल्ला करून त्यास ठार केले असे दुसऱ्या दिवशी माहित झाले. त्यानंतर रात्री बारा वाजता मनोज मरापे याला वन विभागाचे अधिकारी नायगमकर, धुर्वे, ठाकरे, बोरकर, चनकापुरे यांनी उचलून जिथे भारत कोवे यांचा मृत्यू झाला होता त्या घटनास्थळी त्यांना नेले व रात्रभर अमानवीय मारझोड केली. त्यानंतर डोनीवरून रात्री दोन वाजता आशिष नैताम याला उचलून नेले व रात्रभर मारझोड केली. तुम्हीच वाघाची शिकार करायला गेले व भारत कोवे याला मारून टाकून ठेवले असा बयान द्या ! अन्यथा तुम्हाला आम्ही पुन्हा मारझोड करू अशी धमकी दिली व कोऱ्या कागदावर त्या युवकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या या शिवाय मारझोड व धमकावून खोटे बयान लिहिले. राजू झोडे यांना आम्ही ओळखत नाही. राजू झोडे यांना आमच्यावर अन्याय झाल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना फोनवरून बोलावले होते. राजू झोडे यांचा आमच्याशी काही संबंध नाही. मारझोड करून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन आम्हाला व राजु झोडे यांना वन विभाग खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. जर तुम्ही आमचे म्हणणे ऐकले नाही तर संपूर्ण गावाच्या शेत जमिनीवरील तुमचे आम्ही अतिक्रमण हटवु व तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवून आयुष्यभर जेलमधे टाकू अशा प्रकारच्या विविध धमक्या दिलेल्या आहेत.

वनविभाग आपले गुन्हे लपविण्यासाठी आमचे वर व राजू झोडे यांच्यावर खोटे गुन्हे लावून झालेल्या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिका-यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आशिष नैताम, मनोज मरापे, संपत कोरडे, पंचशील तामगाडगे, जितेंद्र बोरूले यांनी पत्रकार परिषदेतुन केली आहे.