शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राजु झाेडेंना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा वन विभागाचा प्रयत्न अन्यायाच्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभारू-वंचित बहुजन आघाडीने दिला इशारा


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी वन विभागाच्या बेबंदशाही, क्रूर वर्तनामुळे निरपराध दलित, आदिवासींवर सातत्याने अमानुष अत्याचार होत आहेत. या अत्याचाराला वाचा फोडणाऱ्या व त्यांना याेग्य न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांचेवर विविध आरोप लावून खोट्या प्रकरणांमध्ये गोवण्याचा वनविभागाचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (बफरचे) गुरुप्रसाद या मुजोर अधिकाऱ्यांच्या डाेळ्या देखत हा सर्व प्रकार घडत आहे असा आरोप राजु झोडे यांनी आज प्रसार माध्यमांशी बाेलतांना चंद्रपूरात केला. उपराेक्त अमानवीय अन्याय अत्याचारा विरोधात येत्या १२ जानेवारीला तीव्र जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी द्वारा देण्यात आला असल्याचे झाेडे यांनी सांगितले.
        
वन विभाग सध्या त्यांच्या जनविरोधी निरंकुश व हुकूमशाही वृत्तीमुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आले असून दिवसेंदिवस वनविभागाकडून जंगलालगतच्या निरपराध गरीब, दलित, आदिवासी युवक तरुणांवर व शेतकऱ्यांवर अमानवी अत्याचार सुरू आहेत. जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली असो की, शिकारीच्या संशयावरून असो येथील लोकांच्या न्याय हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न वन विभाग करीत आहे. जंगलालगतच्या शेतकऱ्यांना मारझोड करणे, त्यांच्या जमीनी उध्वस्त करणे, गरीब दलित आदिवासी युवकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अमानवीय मारझोड करणे. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन ताडोबा क्षेत्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न गुरुप्रसाद व त्यांचे अधिकारी करीत आहेत. या विरोधात जंगलालगतचे गावकरी राजू झोडे यांना न्याय हक्कासाठी आर्त हाक देत असतात. राजु झोडे कशाचीही पर्वा न करता होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात बुलंद आवाज उठवितात. वन विभागाच्या हुकूमशाही व बेबंदशाहीवर पाबंदी आणण्याचे काम प्रशासनाकडून राजू झोडे करून घेतात. त्यामुळेच वन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी राजु झोडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जनतेचा आवाज दाबण्याचे काम करीत आहेत. वनविभागाच्या या अत्याचारा विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी व वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी द्वारा तीव्र आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा राजु झोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शासन व प्रशासनाला दिला आहे.