सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
मारेगाव : येथील शेतकऱ्यांने जमीन एकत्रिकरण योजनेअंतर्गत क्षेत्र दुरुस्ती साठी अर्ज केला. परंतु येथील भूमी अभिलेख कार्यालयाने वारंवार मागणी करून आणि वरिष्ठ कार्यालयाने आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही न केल्याने लक्ष्मीकांत गिरीजाशंकर तेलंग या शेतकऱ्यांने तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषण सुरु केले आहे.
लक्ष्मीकांत तेलंग यांनी २०१९ मध्ये कान्हाळगाव शेत शिवारातील गट नंबर १२,१३,१४ चे एकत्रीकरण योजनेअंतर्गत दुरुस्तीबाबत चा अर्ज केला होता. उपसंचालक भूमी अभिलेख यांनी या संदर्भात मारेगाव भूमी अभिलेख कार्यालयाला आदेश देऊन कार्यवाहीचा आदेश दिला होता. परंतु भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणीसाठी उपस्थित झाले नाही. त्यामुळे सदर शेतकरी त्रस्त झाला. काही दिवसापूर्वी शेतकऱ्याने पत्र देऊन मोजणी करा; अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे.