सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
विठ्ठलवाडी परिसराकडे येणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मंगल कार्यालय व लॉन मध्ये काल ७ डिसेंबरला झालेल्या लग्न सोहळ्यामध्ये वाहनांची जत्रा पाहायला मिळाली. मंगल कार्यालय व लॉन पासून काही अंतरापर्यंत वाहनांची रांग लागलेली होती. पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने लग्न सोहळ्याकरिता आलेली वाहने अगदी रस्त्यावरच उभी करण्यात आली. या वाहनांमुळे विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी कडे जाणारा रस्ता पूर्णतः वेढल्या गेल्याने रस्त्याने दुचाकी काढणेही कठीण झाले होते. रस्त्यावर वाहनांचा अक्षरशः जाम लागला होता. घर परिसराकडे जाणारे नागरिक वाहनधारकांना रस्ता मोकळा करून देण्याची विनंती करित होते. पण रस्ता वेढुन असलेल्या शेकडो वाहनांमध्ये कोणते वाहन कुणाचे हे कुणाचेच कुणाला माहिती नव्हते. रहदारीची पुरती कोंडी झाली होती. घर परिसराकडे कसे जायचे हा प्रश्न नागरिकांना पडला होता. घराकडे जाण्याकरिता नागरिक वाहनांमधून मार्ग शोधतांना दिसत होते. वाहनांच्या गराट्यातुन दुचाकी काढतांना त्यांना चांगलीच कसरत करावी लागली. या लॉन मध्ये होणाऱ्या लग्न सोहळ्याकरिता येणारी वाहने नेहमी रस्त्यावर उभी राहत असल्याने जाणे येणे करतांना नागरिकांना होणारा त्रासही नेहमीचाच झाला आहे. अरुंद रस्त्यावरून लॉन कडे वाजत गाजत येणाऱ्या वरतीमुळेही या रस्त्यावर नेहमी जाम लागताना दिसतो. या मंगल कार्यालय व लॉन मालकाने येथे होणाऱ्या लग्न सोहळ्यांमुळे परिसरातील नागरिकांना असुविधा होणार नाही, याचे नियोजनच न केल्याने रहदारीची नेहमी समस्या निर्माण होतांना दिसते. याकडे नगर पालिकेने लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.
...अन त्या लॉन मध्ये लग्न सोहळ्या करिता येणारी वाहने राहतात रस्त्यावरच उभी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 08, 2021
Rating:
