चंद्रपूर -किरण घाटे
चंद्रपूर : मॉर्निंग वॉक अर्थात सकाळी फिरण्याच्या सवयीमुळे सर्वात मोठा फायदा मिळतो. नित्य सकाळी चालल्याने तुमचे हृदय अधिक मजबूत होते आणि आजार होण्याचा धोका कमी होतो. रक्तप्रवाह चांगला आणि सुरळीत राहतो. निरोगी राहण्यासाठी सकाळी फिरायला बरेच जण जातात. सकाळी चालणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. दिवसाची पहिली प्रहर अप्रतिम आणि कमी प्रदूषित असते. हवा शुद्ध आणि स्वच्छ असते. त्यामुळे मनाला शांतता मिळते. शरीरात अधिक ऊर्जा निर्माण होते. आपण अशा वातावरणात राहतो की जिथे अनेक आजारांचे मूळ हे नैराश्य अर्थात डिप्रेशन असते. घर असो या कार्यालय सध्या सगळेच वातावरण तणावग्रस्त झालेले आहे. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. मात्र, सकाळी पायी चालल्याने शरीराला अधिक फायदा मिळतो.
जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी येथील ब-याच कुटुंबातील सदस्य सकाळी चालायला घराबाहेर पडतात परंतु ज्या रस्त्याने ते फिरायला जातात त्या प्रत्येक रस्त्यावरून रेती तस्कर हे आपले रेती भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालवतात. तसेच सदरहु ट्रॅक्टर ना कुठलाही नंबर नसून ते विना नंबरने चालवित असतात. इतकेच नाही ट्रॅक्टर चे पूर्ण लाईट बंद करुन ठेवतात. त्यामुळे अश्या वेळी अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्यातच अनावधानाने एखादी घटना घडली तर, चालणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल हे तितकेच खरे आहे. सदरहु ट्रॅक्टरांना नंबर प्लेट नसल्यामुळे ते ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचे किंवा कोण चालवत होते हे कळणार नाही. ही बाब अतिशय गंभीर असून संबंधित आरटीओ ऑफिसनी यांना नंबर दिलेले नाहीत का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.
या ट्रॅक्टरांमुळे दिवसेंदिवस सकाळी मार्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण कमी हाेवू लागले आहे. सदरहु रेती तस्करांवर कारवाई होणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. तूर्तास रेती तस्करी ही पहाटे ते सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य नेरीचे डॉ.श्याम हटवादे यांनी केेली आहे.