दोन दिवसीय कबड्डी सामान्यांचा समारोप सोहळा थाटात संपन्न

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : टीएसओ स्पोर्ट्स फाऊंडेशन वणी व तालुका क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय कबड्डी सामन्याचा समारोप सोहळा नुकताच संपन्न झाला. या समारोप सोहळ्यात बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पडला. विजेत्या कबड्डी संघासह खेळाडूंनाही मोठी बक्षिसे देण्यात आली. काँग्रेसच्या माध्यमातून वणी विधानसभा क्षेत्रात निरनिराळे उपक्रम राबविले जात असून पक्ष बळकट करण्याकडे नेते व पदाधिकाऱ्यांची योग्यरीत्या वाटचाल सुरु आहे. महापुरुषांच्या जयंती सोहळ्यातून प्रबोधन करण्यापासून तर कबड्डी सारख्या खेळाचे आयोजन करून खेळाडूंना चालना देण्यापर्यंतचे उपक्रम राबवून काँग्रेसने नागरिकांना जोडण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. कबड्डी सामन्याचा समापन सोहळा महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेत तालुका क्रीडा संकुल समितीच्या मैदानावर (पाण्याची टाकी) अगदीच थाटात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, श्री रंगनाथ स्वामी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रमोद लोणारे, विवेक मांडवकर, डॉ. मोरेश्वर पावडे, डॉ. भाऊराव पावडे, काँग्रेसचे वणी विधानसभा अध्यक्ष संतोष पारखी आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. 

वामनराव कासावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून खेळाडूंचा गौरव करतांनाच राष्ट्रीय खेळांना चालना मिळावी याकरिता आणखी भव्य स्वरूपात कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला. रंगतदार ठरलेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी चिव्वट खेळ खेळत सामना अतीतटीचा केला. हा रोमांचक सामना बघतांना प्रेक्षकही काही काळ स्तब्ध झाले होते. खेळाडूवृत्ती सिद्ध करित अखेर एस एस एन जे रेल्वे नागपूर या संघाने सामना जिंकत प्रथम क्रमांक पटकावला. तर विद्यार्थी मंडळ भद्रावती हा संघ उपविजेता ठरला. प्रथम बाजी मारणाऱ्या संघाला ३० हजार रुपये तर उपविजेत्या संघाला २० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सुभाष क्रीडा मंडळ वडगाव (यवतमाळ) या संघाला १५ हजार रुपये तर चौथ्या क्रमांकावरील संघाला १० हजार रुपयांचे बक्षिस देण्यात आले. तसेच खेळाडूंना वयक्तिक कामगिरी करिताही अनेक बक्षिसे देण्यात आली. कबड्डी सामन्यांच्या या स्पर्धेमध्ये ४० संघांनी सहभाग घेतला होता. क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक प्रा. दिलीप मालेकार व प्राचार्य रघुनाथ मोहिते यांचे या कबड्डी सामन्यांना मार्गदर्शन लाभले. या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप मालेकार यांनी केले. सूत्रसंचालन बेलेकर यांनी आभार प्रदर्शन किशोर बोढे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्रीकांत पोटदुखे, राकेश बुग्गेवार, सरोज मुन, मिलिंद खारकर, योगेश खारकर, अनिल राजगडकर, सुधाकर कोंगरे, सचिन पडाल, मंगेश क्षीरसागर, गणेश गोहोकार, मनोज भगवा, अनिकेत चिकटे, प्रशांत जोगी, राजू रिंगोले, अभय येरणे, यश येडमे आदींनी परिश्रम घेतले.