नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या - मारेगाव शिवसैनिकांची मागणी

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२० सप्टें.) : मारेगाव तालुक्यातील कुंभा मार्डी परिसरात बेंबळा कालव्याचे काम चालू आहे. परंतु येथील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, किंबहुना माहिती न करता सरसकट बेंबळा विभाग शेतकऱ्यांच्या शेतातून पाय रस्त्याचे काम करीत आहे. परिणामी हातातील असलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याची येथील शेतकऱ्यांची तक्रार आहे.
बेंबळा प्रकल्प कालव्यामुळे व अती वृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा आशयचे निवेदन उपसभापती तथा शिवसेना तालुका अध्यक्ष संजय आवारी यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यात पडत असलेल्या सतत च्या कोसळधार पावसाने नदी नाल्या काठावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, करणवाडी कुंभा खैरी रस्ता तसेच मारेगाव ते मार्डी रस्त्याची बिकट परिस्थिती बघता या रस्त्यांचे काम तात्काळ चालू करण्यात यावे. अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी मारेगाव तालुका प्रमुख तथा उपसभापती संजय आवारी, मयूर ठाकरे (युवासेना), पंकज ठाकरे, आशिष घोटेकर, विवेक चौधरी, गजानन ठाकरे (उपसरपंच कुंभा), गजानन आदेवार, प्रवीण नान्ने (सरपंच बोरी), अनिल राऊत, विनोद ठावरी (केगांव), जनार्दन गाडगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

बेंबळा कालवे प्रकल्प व अतीवृष्टी मुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे शेतातील सर्वे व पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी, अन्यथा शिवसेने च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा ही यावेळी देण्यात आला.