सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी शहर व तालुक्यातून सध्या अल्पवयीन मुलींच्या बऱ्याच तक्रारी पोलिस स्टेशनला दाखल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अल्पवयीन मुलींना नाहक त्रास देणाऱ्या तरुणांविषयीच्या तक्रारी वाढू लागल्याने पालक वर्ग चिंतेत आला असून पोलिस प्रशासनावरील ताणही वाढला आहे. अल्पवयीन मुलींची छेड काढणे, मोबाईल वरून संदेश पाठविणे, भर रस्त्यात अडवून धमकावणे, प्रेम लादण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, विनयभंग करणे या तक्रारी पोलिस स्टेशनला दाखल होऊ लागल्याने तारुण्यात पदार्पण करणारी मुले तुरुंगवासात जाऊ लागली आहे. अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हे नोंदविले जात असल्याने तरुणांचं शैक्षणिक जीवन पार उद्धवस्त होत आहे. शैक्षणिक जीवनात गुन्हे दाखल होऊन तुरुंगात जावे लागणाऱ्या या तरुणांचं भवितव्य अंधकारमय होतांना दिसत आहे. तारुण्यातील आंधळं आकर्षण तरुणांचं भविष्य उध्वस्त करत आहे. तारुण्याचा उंबरठा गाठताच मुला मुलींमध्ये शारीरिक आकर्षण निर्माण होऊन ते नको ते उन्माद करतात. एकमेकांना आकर्षित करण्याकरिता ते कोणत्याही स्तराला जाण्याचा प्रयत्न करतात. टीव्ही मालिकांमध्ये दाखविण्यात येणारी भडक दृश्य व कलाकारांभोवती घुटमळलेलं प्रेमाचं कथानक पाहून वयात आलेले मुलं मुली तोच आव आणण्याचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी त्यांचे डाव साधले जातात तर काही ठिकाणी ते तोंड घशीही पडले जातात. कुठे एक तर्फी प्रेमाचा आव आणण्याचा प्रयत्न होतो. तर कुठे मने एकमेकांत गुंतली जातात. शालेय जीवनात वयाचे भान न ठेवता जोडल्या गेलेल्या संबंधात कधी कुणी फितूर होतो, तर कुठे दबाव तंत्र वापरून बळीचा बकरा बनविला जातो. टपोरेगिरीतून प्रेम लादणाऱ्या मजनूंच्या दिवानगीला चाप बसवणाऱ्या तरुणीचं व त्यांच्या पालकांचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. पण नकळत एकमेकांत गुंतलेल्या मुला मुलींचं प्रेम प्रकरण पालकांच्या कानावर पडताच मुलींवर दबाव टाकून ज्या तक्रारी केल्या जातात, त्यात जेमतेम तारुण्यात येणाऱ्या तरुणांचं शैक्षणिक जीवन व भविष्य उध्वस्त होत आहे. शिक्षण घेऊन जीवन सक्षम करण्याच्या काळात त्यांना तुरुंगात जावे लागत असल्याने पालकांसमोर मोठा पेच निर्माण होत आहे. अल्पवयीन प्रेमाचा सुगावा तरुणांसाठी गुन्ह्यांचा बुलावा ठरत आहे. तुरुंगवारी झाल्यानंतर जीवनाची सारी रीतभातच बदलून जाते. आणी त्यातूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा जन्म होतो. त्यामुळे सामंजस्याची भावना ठेवणे जरुरी असून तारुण्यातील पदार्पणातच त्यांच्यावर गुन्हे लादले गेल्यास त्यांच्या भविष्याचा चुराडा झाल्याशिवाय रहात नाही. अल्पवयीनांच्या तक्रारींमध्ये त्यांचे पालक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. कुठे समजूतदारपणा घेतला जातो. तर कुठे तरुणांना टार्गेट केल्या जातं. संगममताचं नातं एकट्यावर लादून तरुणाला आरोपी केल्या जातं. त्यात त्याच अख्ख आयुष्य उध्वस्त होतं. नंतर त्याची झळ बसते ती त्याच्या परिवाराला. घरी जाऊन प्यायला पाणी मागितल्यानंतर हात पकडणं व मोबाईलवर संदेश पाठवून प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करणं, अशा तक्रारींमध्ये अल्पवयीन मुलींच्या पालकांची भूमिका टार्गेट करणारी राहिल्यास तरुणांच्या आयुष्याची धूळधाण झाल्याशिवाय रहात नाही. जेमतेम तारुण्यात आलेले तरुण आरोपींच्या पिंजऱ्यात अडकले जातात. १७ वर्ष काही महिने व १७ वर्ष वयोगटातील मुलींनी आपल्या पालकांसोबत येऊन विनयभंग केल्याच्या तक्रारी दिल्याने या तरुणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होऊन त्यांना तुरुंगात जावे लागते. नकळत दोघांच्याही संमतीने जुळून आलेल्या संबंधात तरुण मात्र गुन्हेगार ठरतात. अपप्रवृत्तीच्या व्यक्तीकडून विनयभंग, अत्याचार, छेडछाड, मारहाण व अश्लील हातवारे केल्या गेल्यास त्यांच्या तक्रारी करणे व त्यांच्यावर गुन्हे नोंदविणे मुलीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय जरुरी आहे. पण दोघांच्याही सहमतीने अल्लड वयात जुळून आलेल्या प्रेम संबंधात तरुणाला टार्गेट करण्याऐवजी सामंजस्याने प्रकरणं हाताळून त्यांना एकमेकांपासून दूर केल्यास तरुणांचं शैक्षणिक जीवन व भविष्य उध्वस्त होण्यापासून वाचेल. व तक्रारीही कमी होऊन पोलिसांचा तपास करण्यामागचा ताण कमी होईल.