सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : खरीप हंगामाच्या तोंडावर निधीअभावी तात्पुरती स्थगिती देण्यात आलेल्या पीक कर्ज वाटपाला अखेर आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. नियमित कर्ज परतफेड करूनही नवीन पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमेटीचे महासचिव मारोती गौरकार यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे निवेदन सादर करून तातडीने कर्ज वाटप सुरू करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे व कृ ऊ बा समितीचे सभापती गौरीशंकर खुराना यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. प्रशासनाला एक आठवड्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित प्रशासनाने मागणीची दखल घेत लेखी आश्वासन दिले होते की, निधी उपलब्ध होताच पीक कर्ज वाटप सुरू करण्यात येईल.
दिलेल्या मुदतीनुसार अखेर आज दि. २२ मे रोजी पीक कर्ज वाटपास सुरुवात झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, आंदोलनाच्या भूमिकेमुळे प्रशासनाला निर्णय घ्यावा अशी भावना निवेदनकर्ते तथा सरपंच तुळशीराम कुमरे यांनी सांगितले आहे.