सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : ते दोघे पती पत्नी. चांगल्या संसारात वैचारिक मतभेद निर्माण झाले. आणि प्रकरण कोर्टात गेले. लोक अदालत मध्ये न्यायाधीश महोदयांनी अत्यंत मानवीय दृष्टीने दोघांची समजूत काढली अन् अनेक वर्षापासून दुरावलेले दोन जीवांचे पुनर्मिलन झाले.
आकाश व धनश्री हे पती-पत्नी. चार वर्षापूर्वी लग्न झाले. दोन वर्षाची चिमुकली मुलगी असतांना संसारात वैचारिक मतभेद निर्माण झाले. प्रकरण वाढले. थेट कोर्टात गेले. दोन्ही पक्षांनी अटीतटीने केस भांडायला सुरवात केली. आज राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दोन्ही पक्षकार हजर झाले. अत्यंत वर्दळ व कामकाजाची धावपळ सुरू असतांना या केस मध्ये मानवीय दृष्टीने काम पाहण्यात आले. निरागस बालिकेला घेऊन आलेल्या धनश्री आणि आकाश यांचे हे प्रकरण मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश के. पी. दवणे साहेब यांनी अत्यंत्य कौशल्याने हाताळले. पती-पत्नी यांचे भांडण होणे हे सर्वश्रुत आहे, परंतु संसाराचे दोन जीव पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात. लहान मुलांसाठीही दोघांनी एकमेकांस समजून काही त्याग करावा लागतो हे त्यांनी दोघांना सांगितले. दोघांना हे मनोमन पटले. अन् कोर्टातून केस संपली. पती पत्नी अत्यंत समाधानाने चिमुकल्या मुलीला घेऊन पुन्हा सुखी संसाराची नवी सुरुवात करण्यास निघाले. यात धनश्री तर्फे ज्येष्ठ अधिवक्ता परवेज पठाण यांनी यशस्वी मध्यस्थी केली.

