सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असून, वणी उपविभागातील राजकीय वर्तुळात भाऊ-ताईंच्या नावांची जोरदार चर्चा रंगत आहे. सोशल मीडियापासून ते चहाच्या टपरीपर्यंत सर्वत्र या चर्चेचे वारे वाहत असले, तरी मतदारांच्या मनात मात्र काहीसं वेगळं चित्र दिसत आहे.
राजकीय गोटांमध्ये उमेदवारीच्या शक्यता, युती-आघाड्यांच्या चर्चांना वेग आला असला तरी जनतेत मात्र या नेत्यांच्या कामगिरीबाबत मिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहेत. काहींनी विकासकामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर काहीजण नवा पर्याय शोधत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नेमकं कोणाचं पारडे जड ठरणार, हे सांगणं सध्या तरी अवघड आहे.
दरम्यान, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवार ठरविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र अनेक ठिकाणी महिला आरक्षण लागू झाल्याने अनेक राजकीय नेत्यांची गोची झाली आहे. काही ठिकाणी उमेदवार मिळविण्यासाठी पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
राजकीय वर्तुळात उमेदवारांची नावे, शक्यता आणि पॅनेल तयार करण्याची चर्चा रंगली असली तरी मतदार मात्र शांत आहेत. “या वेळी चर्चा नाही, तर काम पाहणार” असा सूर जनतेतून उमटत असल्याने निवडणुकीचे गणित अधिकच गुंतागुंतीचे होण्याची चिन्हे आहेत.