सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने तब्बल ३१,६२८ कोटींची ऐतिहासिक मदत जाहीर केली आहे. ही आजपर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचे मत वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सन २०२५-२६ च्या शेती हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे पिके, शेतीजमीन, विहिरी, जनावरे, गोठे, तसेच घरांचे मोठे नुकसान झाले. या सर्व शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ही भरघोस आर्थिक मदत योजना जाहीर केली आहे.
यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव आणि झरी-जामणी तालुके यांचा समावेश करण्यात आला आहे. बोदकुरवार म्हणाले की, “आजवर कोणत्याही सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत दिलेली नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र (देवा भाऊ) फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार.”
शासनाने या मदतीसाठीची कागदपत्रे प्रक्रिया सुलभ केली असून, ज्यांचे बँक व्यवहार पूर्ण झाले नाहीत अशा शेतकऱ्यांनाही मदतीसाठी संधी दिली जाणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत ही गोड बातमी पोहोचवावी, असे आवाहनही माजी आमदार बोदकुरवार यांनी या वेळी केले.
या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.