सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत यंदा अनुसूचित जमातीसाठी राखीव जागा जाहीर झाली असून, ही घटना नगरपरिषदेच्या स्थापनेपासून प्रथमच घडली आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, काही स्थानिक नागरिक व समाजातील जाणकारांचे मत असे आहे की, आतापर्यंत राखीव उमेदवारांना जर योग्य संधी आणि प्रोत्साहन दिले गेले असते, तर आज उमेदवारीसाठी उमेदवार शोधण्याची वेळच आली नसती. समाजात पात्र नेतृत्व असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फक्त आणि फक्त मतांचं राजकारण झाले. “वणी नगरपालिकेत पहिल्यांदाच एस.टी. (महिला) राखीव जागा आहे. त्यामुळे समाजात उत्साह आणि वेगळी निवडणूक लढवण्याची तयारी आहे. ”
आता या निवडणुकीच्या अनुषंगाने समविचारी आदिवासी बांधवांनी सभा घेऊन एकजुटीने वज्रमूठ बांधली असून, मिळालेल्या या संधीचं सोनं करण्याचं आवाहन समाजाला करण्यात आलं.
मात्र,आगामी निवडणुकीत या राखीव जागेवर कोणाची निवड होते आणि अनुसूचित जमातीतील नेतृत्वाला योग्य प्रतिनिधित्व मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात या नव्या अध्यायामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.