सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यात मंजूर असलेल्या 132 केव्ही वीज प्रकल्पाला अद्याप निधी मिळालेला नoसल्याने काम ठप्प आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वारंवार वीज खंडिततेचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मारेगाव तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी ऊर्जामंत्री यांना निवेदन देत तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे.
लांबट यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, मारेगाव तालुक्यातील अनेक गावे आणि औद्योगिक क्षेत्रांना वीज पुरवठा खंडिततेमुळे गंभीर अडचणी येत आहेत. मंजूर प्रकल्पासाठी आवश्यक निधी मिळत नसल्याने वीज व्यवस्थापनात अस्थिरता निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर आणि स्थानिक उद्योगांवर होत असून आर्थिक नुकसानही होत आहे.
म्हणूनच या प्रकल्पासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून देऊन काम सुरू करावे, अशी मागणी अविनाश लांबट यांनी केली आहे. ही मागणी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. नागरिकांना स्थिर वीजपुरवठा मिळावा आणि तालुक्यातील विकास गतीमान व्हावा, यासाठी शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार, माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, ता.सरचिटणीस प्रसाद ढवस यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.