सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : जिल्ह्यातील झरी जामनी तालुक्यातील प्रामुख्याने रायपूर कोलाम पोड सहित इतरही कोलाम पोडावर मूलभूत सुविधा नसल्याचा गंभीर आरोप करीत बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी विभागीय आयुक्त, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांची प्रत्यक्ष भेट घेवून निवेदन सादर केले
सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की भारतीय संविधानाप्रमाणे राज्यात राहणाऱ्या प्रत्येक समुहकरिता मूलभूत सुविधा पुरविणे प्रामुख्याने घरकुल,आदिवासी कोलाम पोडावर पोहच रस्ते, स्वतंत्र शौचालय, विद्युत पुरवठा, मोफत शिक्षण, ह्या मूलभूत सुविधा पुरविणे सरकारची जबाबदारी असताना यवतमाळ जिल्ह्यातील प्रामुख्याने आदिवासी बहुल वस्ती असणाऱ्या झरी जामनी तालुक्यातील रायपूर कोलाम पोड सहित इतरही कोलाम पोडावर कोलाम समाजाच्या कुटुंबांना मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करुन राज्यात चौदावी विधानसभा विस्थापित होवून पंधरावी विधानसभा अस्तित्वात आलेली असताना सुद्धा आदिवासी कोलाम समुहाकडे राज्यकर्ते तथा लोकप्रतिनिधी यांनी अक्ष्यम्य प्रमाणात दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ नूतन सरकारच लक्ष वेधण्यासाठी संविधानात्मक मार्गाने रायपूर कोलाम पोडावरील पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण करणार असल्याबाबत संघटनेच्या मार्गदर्शक त्त्वानुसार लेखी स्वरूपात निवेदन सादर केली असल्याची महिती प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
पुढें प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, पाटणबोरी ते मुकुटबन मुख्य रस्त्यावर रायपूर फाटा ते रायपूर कोलाम पोड पर्यंत डांबरीकरण करण्यात यावे, रायपूर कोलाम पोडवरील निधन झालेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र दफन भूमी करीता जमीन आरक्षित करुन देण्यात यावी, म्हणजे जिवंत आदिवासींना राहण्याकरिता व्यवस्थित जागा तर नाहीच परंतू मरण पावल्यावर सुद्धा दफन करण्याकरिता स्वंतत्र दफन भूमी नसल्याची निवेदनातून खंत व्यक्त केली तसेच पेसा कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासी गोंड, प्रधान, कोलाम समाजाच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी देण्यात यावे, आदिवासी महिलांना महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा बिन व्याजी कर्ज देण्यात यावे, सदर मागण्या ह्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व एकात्मिक आदिवासी विभाग यांच्याशी संबंधित असताना त्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे विभागीय आयुक्त, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग अमरावती यांच्या सहित कायदा व सु व्यवस्थेचा प्रश्न सुरक्षित रहावा म्हणून पोलिस महानिरीक्षक अमरावती यांच्या कडे निवेदन सादर करुन रायपूर कोलाम पोडावरील पाण्याच्या टाकीवर आमरण उपोषण करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून प्रदेश अध्यक्षा सौ.इंदिरा बोंदरे यांनी कळविले आहे.