सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत असताना उन्हाचा कडाका देखील जाणवत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशीच स्थिती काही भागात पाहायला मिळत आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
काल सायंकाळी नवी मुंबई यासोबतच नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील फूर्व भागात जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाने सोयाबीन, भात पिकासह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज कुठे पाऊस?
आज कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.