शेतकरी प्रश्नावरून शिवसेना आक्रमक, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून आज मारेगावात चक्का जाम आंदोलन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गत काही वर्षापासून तालुक्यात अस्मानी व सुल्तानी संकटाचा कायम बळी पडत असलेल्या जगाच्या पोशिंद्यास सर्व स्तरावरून मदतीचा हात आज देण्याची नितांत गरज असताना शासन प्रशासन मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने शेतकरी आत्महत्येत कमालीचा तालुक्यात आलेख वाढत आहे. त्यामुळे सेना आक्रमक होत शेतकरी हिताच्या विविध मागण्या घेऊन आंदोलन, मोर्चा, उपोषण नेहमीच करित असते, आज सुद्धा शेतकरी प्रश्नावरून आक्रमक होत तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरेसेने कडून यवतमाळ-मारेगाव हायवे,करणवाडी फाट्यावर "चक्का जाम आंदोलन" करण्यात आले.
तालुक्यातील शेतकऱ्याच्या कापसाला प्रती क्विंटल 10000/- रू. हमी भाव जाहीर करावा, सोयाबिनला प्रती क्विंटल 7000/- रू. हमी भाव जाहीर करावा, नादुरुस्त, बिघाड व वारंवार वीज खंडित करणारे रोहित्र ताबडतोब दुरुस्त करून देण्यात यावे किंवा नवीन टाकावे, शेतकऱ्यांच्या शेतपंपाना दिवसा 8 तास वीजपुरवठा करण्यात यावा, अतिवृष्टी अनुदान तात्काळ देण्यात यावे, निराधारांना तात्काळ मानधन देण्यात यावे, केंद्र शासनाने केलेला आयात करार रद्द करावा, पिक विम्याची अग्रीम रक्कम 25 टक्के दिवाळीपूर्वी देण्यात यावे. या प्रमुख मागण्यांकरिता (ता.3 नोव्हें) रोजी शिवसेना (उबाठा) तालुका शाखेच्या वतीने असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. सदर मागण्या मान्य न झाल्यास 6 नोव्हेंबर रोजी मारेगावात चक्काजाम करू असा इशाराही सदर निवेदनातून यावेळी देण्यात आला होता.
दरम्यान ता. 3 नोव्हेंबर रोजी शेतकरांच्या विविध मागण्या घेऊन संबंधित विभागांना अल्टीमेटम देण्यात आल्यानंतर ही शासन प्रशासनाने दखल घेत नसल्याने आज सोमवारला करणवाडी फाट्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले, दरम्यान, यवतमाळ मार्गांवरील काही काळ वाहतूक कोलमडली होती. तहसीलचे अधिकारी, महावितरण चे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाल्यावर व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करूनच हे चक्का जाम आंदोलन निवळले. जर सद्यस्थितीत सुधारणा झाली नाही, तर शिवसैनिक आणखी तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन परत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, असा गर्भीत ईशाराही देण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संजय आवारी व युवासेनाचे तालुका प्रमुख मयूर ठाकरे, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, उप तालुका प्रमुख राजू मोरे, ता. संघटक सुनील गेडाम, संचालक विजयभाऊ अवताडे, युवासेना शहर प्रमुख गणेश आसुटकर, जिवन काळे, पंकज बलकी, यांच्या सह शिवसेना (उबाठा) चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तथा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या चक्का जाम आंदोलनात सहभागी झाले होते.