सह्याद्री चौफेर | अनंत पाचपोहर
मार्डी : सध्या सोयाबीन वर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होत असून बहुतांश सोयाबीन पिवळे पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली असून उत्पादन क्षमता घटण्याची भिती शेतकऱ्यात निर्माण झाली आहे.
जिल्ह्या सह मारेगाव तालुक्यात मागील काही दिवसापासून पावसाचा कहर चांगलाच वाढला आहे. जाता जाता अधून मधून कुठे ना कुठे तो वरुण राजा नको म्हटलं तरी हजेरी लावतो आहे. अशातच सोयाबीन शेवटच्या टप्प्यावर असताना या पिकांवर पिवळ्या मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे. तालुक्यातील 60 ते 70 टक्के याचा प्रसार वाढल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हातातील पिक निसटेल का अशी चिंता शेतकऱ्यांना लागली असून या रोगाने जगाचा पोशिंदा हवालदिल झाला आहे.
पिवळा मोझॅक रोगामुळे सोयाबीनचा शेवटच्या टप्प्यात घात करत उत्पादन घटेल किंबहुना हातून जाईल अशी सध्या परीस्थिती निर्माण झाली असून, या साठी कृषी विभागाचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात कुठे कमी पडतं,असा सवाल ही उपस्थित होत आहे. परंतु योग्य उपाययोजना व संबंधित विभागाचे मार्गदर्शन मिळत नसल्याने हा रोग वाढत असल्याचे शेतकऱ्यांतून ओरड आहे.
एका माहितीतून असे समोर आले की, ह्या रोगामुळे पिकांचे 70 टक्के ते 90 टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते, असे असताना कृषी तज्ञ् व संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष घालून तालुक्यातील शेतकरी बांधवाना योग्य मार्गदर्शन व उपाययोजना बाबत माहिती द्यावी असे, तालुक्यातील किन्हाळा येथील स्वाभिमानी शेतकरी महादेव कपाळकर व मनोज आसेकर, आत्मराम गिरसावळे या शेतकऱ्यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले आहे.