सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
बऱ्याच जणांना आपल्याला आपल्या आजोबांच्या प्रॉपर्टीचा किती वाटा मिळेल, कधी मिळेल, याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणजेच नातवंडांना त्यांच्या आजोबांच्या प्रॉपर्टीतला वाटा मिळण्याचा अधिकार असतो का, याबद्दल जाणून घेऊ या.
काय सांगतो कायदा?
जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युपत्र (इच्छापत्र) न करता मरण पावते, तेव्हा संपत्तीवाटपाबद्दलचा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय कायद्यानुसार, आजोबांच्या स्वतःच्या संपत्तीवर नातवाचा जन्मसिद्ध अधिकार अजिबात नसतो. तर, पूर्वजांच्या पारंपरिक संपत्तीवर त्याचा जन्मसिद्ध अधिकार असतो. म्हणजेच आजोबांना त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेल्या (वडिलोपार्जित) संपत्तीतला नातवाचा वाटा त्याचा जन्म झाल्या झाल्या निश्चित होतो; मात्र त्याच्या आजोबांनी स्वतः विकत घेतलेली काही प्रॉपर्टी असेल, तर ते ती कोणाच्याही नावे करू शकतात. त्याला नातू आक्षेप घेऊ शकत नाही.
एखादी व्यक्ती इच्छापत्र करण्याआधीच मरण पावली, तर त्या व्यक्तीची स्वतःची प्रॉपर्टी त्या व्यक्तीचे जवळचे वारसदार म्हणजेच त्याची पत्नी, मुलगा, मुलगी यांच्या नावे होते. त्या व्यक्तीच्या नातवाला त्यातला वाटा मिळत नाही. मृत व्यक्तीची पत्नी, मुलगा, मुलगी यांच्याकडे वारसा हक्काने आलेली प्रॉपर्टी ही त्यांची वैयक्तिक प्रॉपर्टी समजली जाते. त्या प्रॉपर्टीत वाटा मागण्याचा अधिकार अन्य कोणालाही नसतो. संबंधित व्यक्तीचा मुलगा किंवा मुलगी यांचा त्या व्यक्तीच्या आधी मृत्यू झाला असेल, तर पहिला मुलगा किंवा मुलगी यांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीतला जो वाटा मिळणार असेल तो त्यांच्या कायदेशीर वारसाला मिळेल.
आजोबांच्या संपत्तीत नातवाला वाटा मिळतो का? काय सांगतो कायदा? जाणून घ्या...!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 24, 2023
Rating:
