Rain update: अखेर पावसाने तालुक्याला भिजवले

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मॉन्सूनची थांबलेली वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली आहे. मागील महिन्यापासून चाळीस अंशाच्या वर असलेले तापमान, त्यातच अधून मधून सुटणारा वादळी वारा, पाऊस कधी पडणार या बाबत हवामान विभागाकडून मिळणार्‍या ‘तारीख पे तारीख’ आणि या सर्वामुळे पाऊस कधी पडणार याची शाश्वती न राहिल्याने रोज आकाशाकडे टक लाऊन बसलेला हवालदिल झालेला जगाचा पोशिंदा, अशी बिकट अवस्था यंदा शेतकऱ्याची झाली आहे.
मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आता आर्द्रा नक्षत्र लागले. पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण तयार होऊन रात्री झालेल्या
हलक्या सरीने जन सामान्य सह शेतकरी काहीसे सुखावले असले तरी, पाहिजेत तसा पाऊस झाला नाही, मात्र आज सोमवारला दुपारी आलेल्या पावसाने जोरदार शहरासह ग्रामीण भागात हजेरी लावली आहे. 

मागील एप्रिल, मे महिन्यात अवकाळी पावसाने चांगलाच दणका दिला. ऐन उन्हाळी पिकांच्या वेळेला जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने अनेक शेतकर्‍यांचे पिक शेतात भिजल्याने उत्पन्न घटले,त्यामुळे उन्हाळ्यात पिकपाणी घेणाऱ्या शेतकर्‍यांचे प्रचंड नूकसान झाले.
तूर्तास संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने आकाशाकडे नजर लावून बसलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. 
पूर्वमोसमी पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पूर्वमशागतीसह पेरण्यांची कामे खोळंबली होती. मात्र, मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत झाल्यानंतर रात्री आणि दिवसांपासून तालुक्यातील विविध भागांत पावसाला सुरुवात झाली असून आता खरिपाच्या पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.