कवितेचा प्रांत समृद्ध होण्यासाठी रसिकांचा दर्जा वाढायला हवा - प्रा. श्रीकांत पाटील


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : कवी हा जेव्हा कविता लिहून पूर्ण करतो त्यानंतर ती त्याची राहत नाही. ती रसिकांच्या आस्वादनासाठी उपलब्ध होते. रसिकांनी त्या कवितेतील मर्म समजून तिला न्याय दिला पाहिजे. श्रेष्ठ कविता कोणती हे ठरविण्याचा सर्वस्वी अधिकार हा रसिकांचा असतो. त्यामुळे कवितेला श्रेष्ठत्व प्रदान करण्यासाठी व कवितेचा प्रांत समृध्द करण्यासाठी रसिकांचा दर्जा वाढायला हवा असे उद्गार प्रसिद्ध गीतकार व संगीतकार प्रा. श्रीकांत पाटील यांनी काढले. शेगांव ( बु ) ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरी एक दिवसीय राज्यस्तरीय काव्यसंगितीचे आयोजन करण्यात आले. या काव्यसंगितीच्या पहिल्या सत्रात कवितेवर बोलू काही या कार्यक्रमात ते बोलत होते. संवादक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रमोद नारायणे यांनी भूमिका पार पाडली. याप्रसंगी प्रसिध्द समीक्षक डॉ. संदीप भेले, कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर उपस्थित होते. कवितेविषयी प्रा. प्रमोद नारायणे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्रीकांत पाटील म्हणाले, कवींसमोर प्रत्येक काळात आव्हाने असतात म्हणूनच कवी शब्दांच्या द्वारा प्रगट होत असतो. त्या आव्हानांना उलथून लावण्याचे काम कवी करतो. कविता ही काही शब्दांचा खेळ नसतो. तर ती जीवनाचे भाष्य करणारी एक कृती असते. कवी कविता लिहितो म्हणजे तो त्या काळाच्या पटावर आपले शब्द कोरत असतो. असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कविमनाची अवस्था, काव्यनिर्मिती प्रक्रिया, कवितेतील आशय अभिव्यक्ती यावरही त्यांनी विस्तृत भाष्य केले. कार्यक्रमाला देवराव कांबळे, दादाजी खोब्रागडे (वणी ) आत्माराम खैरे ( चंद्रपूर ) मुख्याध्यापक चंद्रभान देठे ( भद्रावती ) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यशस्वितेसाठी भारत रामटेके, माविम सहयोगीनी रंजू रामटेके, वनिता माकोडे, गीता फुलकर, सावित्री सीएमआरसी सचिव वंदना वाढई , सुधा भोज, मंदाताई वैद्य, प्रियंका नागदेवते यांनी मोलाचे सहकार्य केले.

प्रति,
मा. जिल्हा प्रातिनिधी
दैनिक नवजीवन
चंद्रपूर

आपल्या लोकप्रिय दैनिकातून वरील बातमी प्रकाशित करावी ही विनंती.

प्रा. प्रमोद नारायणे
कार्यवाह
कवितेचे घर