मोहदा ग्रामपंचायतच्या प्रयत्नाला यश: वस्तीमधील लोकांचं काळोखातलं जीवन झाले प्रकाशमय..


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : सध्याच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि रोजगारासह वीजही मुलभूत गरज झाली आहे. त्यामुळे आपल्या घरची एक तास वीज गेली, तरीही जीव अगदी कासाविस होतो. त्यामुळे सलग 20 ते 25 वर्षे रात्रंदिवस वीजेविना जगण्याची तर आपण कल्पनाही करु शकत नाही. परंतु, तालुक्यातील मोहदा गावातील वार्ड नं 3 मध्ये सध्या या जगण्याचा अनुभव घेत होते. 

गेल्या 20 वर्षांपासून या गावातील वार्ड नं 3 मधील नागरिक वीजेशिवाय काळोखातच जगत होते. अनेक वर्षांपासून विजेशिवाय जगण्याचा संघर्ष करत होते. परंतु आता मोहदा येथील तीस घरांच्या वस्तीतील लोकांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे म्हणायला हरकत नाही. येथील नवनिर्वाचित सरपंच, उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावातील वार्ड नं तीन मध्ये सहा इलेक्ट्रीक पोल (खांब) टाकून त्यावर सात पथदिवे (लाईट) लावले. 

मोहद्यातील वार्ड नं 3 मध्ये नागरिकांच्या जीवनातील काळोखाचे 20 ते 25 वर्षे लोटले आहेत. या दरम्यानच्या काळात सत्ताही बदलली. मात्र, ढिम्म झालेलं स्थानिक प्रशासन जागं झालं नाही. मात्र या पंचवार्षिक मध्ये या मोहदा गावाला लाभलेली धडाडीची महिला सरपंच अभ्यासू म्हणून लाभली आणि इथल्या वार्डातील 30 घराच्या वस्तीमधील लोकांचं काळोखातलं जीवन प्रकाशमय झाले आहे. 

मागील काही दिवसात त्यांना कामे करित असतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र,त्यांनी विकासकामाचा घेतलेला वसा कायम ठेवत ग्रामपंचायत कमेटीने वीस ते पंचवीस वर्षांपासून अंधारात असलेल्या वार्डाला "तिमिरातुनी तेजाकडे" नेण्यासाठी जो अथक प्रयत्न केला त्यासाठी त्यांचे निकाश शेंडे, अनिल ताजने, गणेश लोडे, अक्षय गायकवाड, प्रदीप ढवळे, बडी वांढरे, जनार्धन दुधकोहड, प्रशांत जुनगरी, संतोष नक्षीने, जगन सोयाम, अरविंद खंडरे, श्रीराम उरकूडे, व वार्डातील जनतेनी ग्रामपंचायत चे आभार मानले.