मच्छिन्द्रा वासीयांनी जपली अनेक वर्षांची परंपरा


नितेश वनकर | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : वर्षभर शेतकरी वर्ग ज्यांच्या भरोशावर शेती करत असतो. त्या बैलांचा पोळा मोठ्या उत्साहात मच्छिन्द्रा येथे साजरा करण्यात आला. मारेगाव तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे अनेक वर्षांपासून ऐतिहासिक बैलांचा पोळा भरतो. मात्र, कोरोना काळात दोन वर्षे या पोळाचे आयोजन नाममात्र करण्यात आले होते.     
पिढ्यान् पिढ्या हा बैलांचा पोळा येथील सर्वधर्म समभावातून जोपासला जात आहे. स्पर्धेच्या युगात ट्रॅक्टरचे प्रमाण वाढले असतांना मात्र, आजही पोळ्याच्या आदल्या दिवशी "आज आवतन घ्या, उद्या जेवायला या" म्हणत बैलांचे खांदे शेकत असतात. व दुसऱ्या दिवशी बैलांना रंगरंगोटी व सजावट केले जात असत. अशातच सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रथम जोडीला मान दिला जातो. हनुमान मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा अगोदर आंब्याच्या बांधलेल्या तोरणाला तोडले जातात, ठरलेल्या मैदानात गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या बैलांच्या जोड्या एकत्र येत असत. पोळ्यानिमित्त गावातील नागरिक हे बैलांच्या पाया व एकमेकांना अक्षदा लावून नमस्कार घेत असतात. एकमेकांच्या घरी बैल जोडी नेवून भेट देत असतात.
पोळा पाहण्यासाठी गावातील महिला, पुरुष मोठ्या प्रमाणावर मिळेल त्याठिकाणी उपस्थित होते. या निमित्ताने जातीय सलोखा ठेवणे ही मच्छिन्द्रा गावची परंपरा आहे.