महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त..

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यात गॅस, पेट्रोल आणि डिझेल सह खाण्याच्या जीवन आवश्यक वस्तूंच्या किमतीने कळस गाठला आहे त्यामुळे या दरवाढीने ग्रामीणभाग होरपळल्या जात आहे, या भाववाढीला केंद्र सरकार सह राज्य सरकारही तेवढेच जबाबदार आहे.

 इंधना करिता वनातील लाकडांचा वापर होतो त्यामुळे जंगले नष्ट होत चालली असे भासवून सरकारने ग्रामीण भागात गॅस योजना गरिबांच्या माथी मारली काही दिवस मोफत व नंतर हळू हळू पैसे आकारणी करून गॅस सिलेंडर दिल्या जात होते, तेच सिलेंडर आता हजारी पार करून नगदीने खरेदी करावे लागत आहे, याचे चटके ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुराला सहन करावे लागत आहे, कमी दरातील सिलेंडर योजना आता बंद करण्यात आली, त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाना हे सिलेंडर १०६० ते ११०० रुपयाला खरेदी करावा लागत आहे, सोबत पेट्रोल आणि डिझेल बाबत तीच परिस्थिती झाली.
     
दारव्हा तालुक्यात मागील दोन वर्षापासून बस सेवा बंद असल्याने तालुक्यातील जनतेला प्रवासा करिता खाजगी वाहनाचा वापर करावे लागत आहे, या डिझेल पेट्रोलच्या दरवाढीने वाहनांचे प्रवास भाडे दाम तिप्पट चौपट झाले आहेत हा फटका सामान्य जनतेला मुकाट्याने सहन कारावा लागत आहे.

तसेच जीवन आवश्यक प्रत्येक वस्तूंची दर वाढ झाली आहे, खाण्याचे तेल डाळ, साखर या सह अनेक वस्तूंची दरवाढ होत असल्याने ग्रामीण भागातील गरीब वर्ग यात होरपळल्या जात आहे या महागाईचे चटके उनेपेक्षा तीव्र आहे.