भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य व्याख्यानमाला

रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाद्वारे आभासी प्रणालीद्वारे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे तर प्रमुख मार्गदर्शक डॉ. आर. बी. वाघ, इतिहास विभागप्रमुख, श्रीमती केशरबाई लाहोटी कॉलेज, अमरावती हे उपस्थित होते. डॉ. वाघ आपले विचार मांडत असताना डॉ. बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्वशक्तिनिशी जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केले आणि वृतपत्राच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे सुद्धा काम केले. तसेच डॉ. सोडनर सर इतिहास विभागप्रमुख आपल्या प्रास्ताविकमध्ये बोलत असताना बाबासाहेबाांनी केलेला त्याग, संविधानिक मूल्ये व समाजासाठी सोसलेल्या अगणित यातना याची जाण यावर आपला प्रकाश टाकला तसेच रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. भगत सर बोलत असताना बाबासाहेबानी अनेक अडचणींचा सामना करून घेतलेले परदेशी शिक्षण व शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीने शिक्षणाला दिलेले प्रथम स्थान यावर आपले भाष्य केले.
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. घरडे सर बोलत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही यावर आपले मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद चव्हाण यांनी मांडले. यावेळी प्रा. अक्षय जेणेकर सर व आदी मान्यवर उपस्थित होते.