फिस्कीच्या जंगलाला लागली आग


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील मंगरूळ,सालेभट्टी गावच्या हद्दीतील फिस्की जंगलाला आग लागून शेकडो एकर वनसंपत्ती जळून खाक होऊन वनसंपदा धोक्यात आली.

सातत्याने लागणा-या वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून उपाययोजना केली जात नसल्याने येथील शेकडो हेक्टरवरील वनसंपदा धोक्यात आली आहे. परिणामी वणव्यांमुळे नैसर्गिक साधनसंपत्तींची तर हानी होतेच आहे. मात्र, जंगलातील पशुपक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

सालेभट्टी, पिसगाव, वडगाव, मांगरूळ, वरूड आदी पसिरारत फिस्की जंगलाचे वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी परिसरामध्ये आग लागून जंगली गवत, झुडपे, साग, शिसम, खैर, कडुनिंब, बाभूळ व इतर झाडे जळून खाक होतात. शिवाय वन्यप्राण्यांचाही अधिवासही आगीमुळे नष्ट होतो. यामुळे मोर, हरिण, चितळ, सांबर, ससा, घोरपड, रोही असे जंगली प्राणी व पक्षी या परिसरातून इतरत्र स्थलांतर करतात. किंबहुना जंगल परिसर सोडून शेतशिवाराकडे मोकाट फिरतात तसेच परिसरातील सुकलेली झाडेझुडपे, गवत, पालापाचोळा, जवळपास जलस्त्रोतांचा अभाव व उष्ण वाहणारे वारे आदी कारणामुळे आग लागल्यानंतर आटोक्यात आणणे कठीण होते.

त्यामुळे जंगलाला आग लागू नये किंवा आग लागली तरी तेवढ्या परिसरापुरती मर्यादीत राहावी यासाठी वनविभागाने परिणामकारक उपाययोजना करावी, अशी  मागणी वन्य व वृक्ष प्रेमीकडून होत आहे.