एकल महिलांनी परिवर्तन घडवून आणावे - कुसुम ताई अलाम


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : कोरोनामुळे विधवा झालेल्यांनी नैराश्य दूर करून मकर संक्रातीला सुर्य दिशा बदलतो तो मकरराशीतून उत्तरायण होतो त्याप्रमाणे निसर्गाचे परिवर्तन लक्षात घेऊन एकल महिलांनी आपल्या जीवनात निसर्गाप्रमाणे परिवर्तन करणे आवश्यक असल्याचे मत कुसुम ताई अलाम यांनी नुकतेच व्यक्त केले.

आई वडिलांच्या घरापासून, बालपणापासूनच आपण कपाळावर गंध, कुंकू लावत असताना अचानक पती निधना नंतर ते उघडे ठेऊ नये.कुंकू लावण्याने आत्मविश्वास निर्माण होतो असेही त्यांनी म्हटले. कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांना समाधान देण्यासाठी व त्यांच्या जीवनात हिमतीने जगण्याचा पर्याय उभा करून देण्यासाठी विलास निंबोरकर अंधश्रद्धा निर्मुलन समिती कार्याध्यक्ष यांच्या पुढाकाराने विकास भवन येथे संक्रांत निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मनोहर हेपट यांनी एकल झालेल्या महिलांना शासन स्तरावरून विविध प्रकारच्या योजनांची माहिती देऊन त्यांना या याेजनेचा लाभ मिळावा या साठी जिल्हाधिकारी यांचे पर्यंत जाऊन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले काहीही अडचणीत आल्यास निर्भयपणे सांगितले पाहिजे. या वेळी उपस्थित महिलांनी अडीअडचणी सांगत मन मोकळे करून आपल्या भावना व्यक्त केल्या. अतिशय भावपूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. यावेळी एका महिलेने स्वतःचे दुकान सुरू केले असून ती खंबीरपणे समाजकार्य करीत आहे ही मोठी उपलब्धी समाधान शिबिरामुळे घडून आल्याचे मत तिने व्यक्त केले.
महिला दुःख बाजूला सारून बोलत होत्या. संजय भसारकर व महिलांची या वेळी उपस्थिती होती. नाशिका गुरनुले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.