वणीचे शाखा कार्यालय बंद करून सहारा इंडियाने गुंडाळला गाशा, गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यात जमा
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
सहारा इंडियाने संपूर्ण भारतात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. सहारा एअरवेज, सहारा एंटरटेनमेंट व न्यूज चॅनल, सहारा क्रिकेट, सहारा सिटीज यामुळे सहारा इंडियाचं देशाबरोबरच विदेशातही नाव लौकिकस आलं होतं. आर्थिक समृद्धता ही सहाराची ओळख बनली होती. त्यामुळे गुंतवणूकदारही सहारा इंडियाकडे आकर्षित झाले. राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत रक्कम दुप्पट होण्याचा सहारा इंडियाचा कालावधी कमी असल्याने सामान्य वर्गाने मोठ्या प्रमाणात सहारामध्ये गुंतवणूक केली. सुरुवातीचे काही वर्ष ग्राहकांना पैसाही बरोबर मिळाला. पण २०११ नंतर सहाराचं गणित बिघडलं. गुंतवणूकदारांना पैसे देतांना टाळाटाळ होऊ लागली. फिक्स बॉण्डची मुद्दत भरल्यानंतरही पैसे न देता कालावधी वाढवून देण्यात येऊ लागला. नागरिकांनी काही काळ त्यांची टोलवाटोलवी सहन केल्यानंतर नागरिक पैशासाठी आक्रमक होऊ लागले. पण तरीही पैसे न मिळाल्याने ग्राहकांच्या चिंता वाढू लागल्या. आता तर सहाराची वणीतील शाखाच बंद झाल्याने गुंतवणूकदारांच्या उरात धडकी भरली आहे. कष्टातून पै पै जमा करून गुंतवलेला पैसा सहारा बुडवणार तर नाही ना, या काळजीने ग्राहकांची झोप उडाली आहे. कुणी मुलांच्या लग्नासाठी गुंतवणूक केली होती. तर कुणी घराचे स्वप्न पहिले होते. कुणी शिक्षणासाठी तर कुणी भविष्याच्या नियोजनासाठी गुंतवणूक केली होती. पण सहारा इंडियाने ग्राहकांची फसवणूक करून त्यांचे स्वप्न धुळीस मिळविले आहे. गोरगरिबांनी गुंतवणूक केलेले कोट्यावधी रुपये सहाराच्या घशात जाण्याची चिन्हे दिसत आहे. सेबीकडे पैसे जमा असल्याची बतावणी करून ग्राहकांची आजवर बोळवण करणाऱ्या सहाराने आता सेबी पैसा देत नसल्याचे सांगत हात वर केल्याने गुंतवणूकदार कमालीचे संकटात आले आहेत. सहारा इंडिया या नामांकित खाजगी बँकेने ग्राहकांची फसवणूक केल्यानंतर नागरिकांचा आता खाजगी बँकांवरील विश्वास उडू लागला आहे. आता सहाराने बोट दाखविलेल्या सेबीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असून गोरगरीब गुंतवणूकदारांचा पैसा परत मिळवून देण्याकरिता शासनाने मध्यस्थी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.