सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
गुंजेचा नाला आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांकरिता नेहमी वरदान ठरला आहे. या नाल्याच्या पाण्यावर अनेक शेतकरी आपल्या शेतीचं सिंचन करतात. हा नाला अतिशय मोठा असल्याने या नाल्याचा प्रवाह नेहमी वाहता असतो. या नाल्याचे पाणी शेतीकरिता उपयोगी पडत असल्याने येथील शेतकरी त्या अनुषंगाने शेतपिकांची लागवड करतात. चणा व इतर पिकांची शेतात लागवड केली असल्याने त्यांना वेळोवेळी पाणी देणे आवश्यक आहे. परंतु या नाल्याचा पाण्याचा प्रवाहच बंद करण्यात आल्याने शेतकरी चांगलाच चिंताग्रस्त झाला आहे. मोटारपंपाच्या साहाय्याने इत्तर मार्गाने सुरु ठेवण्यात आलेला पाण्याचा प्रवाहही मागील काही दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पाण्याअभावी शेतातील पिकं सुकू लागली आहेत. वारंवार विनंती करूनही कंत्राटदार पाण्याचा प्रवाह सुरु ठेवण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मोटारपंप लावून वेगळ्या मार्गाने सुरु ठेवण्यात आलेला पाण्याचा प्रवाहही बंद करण्यात आल्याने शेतकरी संकटात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पायापोटी लागूनही कंत्राटदार पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरु ठेवत नसल्याच्या व्यथा शेतकऱ्यांनी बोलून दाखवल्या आहे. पाण्याअभावी शेतपिकांचे नुकसान झाल्यास कोणता पर्याय निवडावा असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तेंव्हा प्रशासनाने कंत्राटदाराची कानउघाडणी करून नाल्याच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.