"क्षण धुंद झाले"
नवरंगाच्या या सोहळ्याचा आज कुणाला पण, हेवाच वाटावा ...मेंदीच्या साजुक गंधात वातावरण भारलेले ...हिरव्या काकणाची चाललेली लयबद्ध किणकिण ...आणि हो अय्याई ..ग!! ती नवसंसारात पदार्पण करू पाहणारी मुग्ध कलिका. ..तिच्या गाली गुलाब फुललेले...गुलाबपंखुडीच्या मऊशार पायघड्यावर अलवार, मऊसूत पावले लाजत लाजत विवाहवेदीकडे मार्गक्रमण करणारी ,षोडशा....कित्ती बुवा हळवा क्षण ...आजचं तिचं ते नटणं,फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी रे ....यापुढे ही तन मन धन तुलाच बहाल करून, सारी भिस्त तुझ्या स्कंधी सोपवायची. ..केवढा विश्वास हा ...एका पर्यावरण ...संपूर्ण जीवन बहाल करतेय ती तुला ...
सनईचे मांगल्यमयी सूर वाजले की डोक्यावर चार अक्षता पडतील ...आणि गर्भरेशभी धन तुझ्या स्वाधीन केले जाईल..फुलराणी सारखी माहेरी बागडणारी. .. आपले कर्तव्य सिद्ध करायला निघाली. ..तुझी अभिसारिका होऊन येते रे ती ...पट्टराणी बनवून तुझ्या हृदय मंचावर विराजमान व्हायला तयार रहा तू पण ...
एकेक अधिरल्या घटनांची नांदी होईल ...मधुचंद्राची प्रथम रात्र..बाळाची चाहुल किती किती रे ...मला तर विचार करूनच लज्जित व्हायला होतं...
क्षण धुंद झाले
मन कैफात न्हाले
अधरावरील उखाणे
शर्करामय झाले...
तू असा जवळी रहा, असे जणू गात्रा गात्राची गुणगुण ...केवळ फक्त श्वास नी स्पर्श सुखाने धुंद गंध व्हावी अबोल प्रीतीचा बहर अनुभवावा .. हृदय कपारीत, आठवांच्या स्वर्णिम क्षणांचे हे असे गाठोडे .. सदोदित जपून ठेवावे असे..