ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत कायम करा - ग्रामरोजगार तालुका संघटनेची मागणी


सह्याद्री न्यूज | सुनील शिरपुरे
झरी, (२५ सप्टें.) : प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामरोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने ग्रामरोजगार सेवक काम करण्यास कटिबद्ध आहे. परंतु गाव पातळीवर काम करत असतांना ग्रामरोजगार सेवकांना सर्वांसोबत सामंजस्याने वागावं लागते. असं असतानाही ग्रामरोजगार सेवकांना अनेक समस्यांना तोंड देत, अनेक अडचणीतून मार्गक्रमण करावे लागते. या बाबतीत ग्रामरोजगार सेवकांच्या या समस्या व अडचणी कुणीच समजून घेतांना दिसून येत नाही. याची खंत वाटते.
            
गेल्या १५ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवक मानधन तत्वावर काम करत आहे. पण हे काम करत असतांना सर्वांसोबत गोडीगुलाबीने वागून कामे पूर्णत्वास न्यावे लागते. येथे ग्रामरोजगार सेवकांमार्फत कोणत्याही प्रकारे पक्षीय भेदभाव केल्या जात नाही. तरी पण कार्यरत पॅनलला त्यांच्या एखाद्या विरोधी व्यक्तीशी साधं व सहज बोलत असल्याचं निदर्शनास आल्यास हा राजकारण करत आहे, असा निकष लावला जातो. खरं राजकारण तर तेच करत असतात. परंतु त्यांना संशयाच्या भूताने पछाडल्यानंतर त्यांनी लावलेल्या निष्कर्षाच्या माध्यमातून सुडाची भावना निर्माण होत असल्याचं सर्वत्र दिसून येत आहे.
            
तसेच प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत पॅनलच्या माध्यमातून नविन ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांची निवड केल्या जाते. परंतु राज्यामध्ये ब-याच ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर झाल्यावर या आजीमाजी पॅनलकडून सुडबुद्धीने ग्रामरोजगार सेवकांवर खोटे आरोप करून, त्यांच्यावर दोषारोपण करून कामावरून कमी करण्याचा बेत आखला जात आहे. अशाप्रकारे जाणिवपूर्वक अन्याय केल्या जात असल्याचं उघडकीस येत आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून ग्रामरोजगार सेवकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासामुळे त्यांना कोणत्या निर्णयाला सामोरे जावे लागते, याचा अंदाज बांधने खूप अवघड आहे. शिवाय एक कुटूंब प्रमुख म्हणून त्यांच्या कुटूंबाच्या पालनपोषनाची जिम्मेदारी ग्रामरोजगार सेवकांवर असल्याने त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येत आहे व त्यांच्यावर अशाप्रकारे अनेक अन्याय होत असल्याचं निदर्शनास येत आहे.
            
या सर्व गोष्टी विचाराधीन ठेवून राज्यातील एकूण २८,१४४ ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक यांना ग्रामपंचायत स्तरावर कायम करण्याचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना कायम करून सेवेत समाविष्ट करून न्याय देण्याची मागणी होत आहे. अन्यथा २ ऑक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व तहसिल कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरवले आहे.
            
याच पार्श्वभूमीवर झरीजामणी तालुका संघटनेकडून गटविकास अधिकारी साहेब झरीजामणी, नायब तहसिलदार साहेब झरीजामणी व पोलिस स्टेशन पाटणचे ठाणेदार संगिता हेलोंडे मॅडम यांना निवेदन देण्यात आले. पंचायत समिती झरीजामणीचे गटविकास अधिकारी मा.गजानन मुंडकर साहेबांना निवेदन देतांना झरीजामणी तालुका संघटना. यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंकजभाऊ पानघाटे, उपाध्यक्ष सुनील कुमरे, सचिव रामभाऊ पेंदोर व अनिल आत्राम, दिपक बोबडे, चरणदास राठोड, द्न्यानेश्वर उईके, राजू कांबळे, विष्णू वाढई, गजानन चवरडोल आदी ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.
ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत कायम करा - ग्रामरोजगार तालुका संघटनेची मागणी ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत कायम करा - ग्रामरोजगार तालुका संघटनेची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on September 25, 2021 Rating: 5
Powered by Blogger.