शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिसून येतो मोकाट जनावरांचा संचार
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (०२ सप्टें.) : शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा संचार वाढला असून जनावरे रस्त्याच्या मधोमध तळ ठोकून रहात असल्याने रहदारीला अडथळे निर्माण होण्याबरोबरच वाहतुक विस्कळीत होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यावर अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याआधीही ही मोकाट जनावरे अपघाताचे कारण बनली आहे. काही दिवसांआधी रस्त्यावरील मोकाट वासराला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले होते. तर वासरूही जागीच ठार झाले होते. वणी वरोरा हा प्रमुख मार्ग मोकाट जनावरांचा अड्डा बनला आहे. या मार्गावर नेहमी जनावरांचा ठिय्या असतो. या जनावरांचा कुणी काळजीवाहू मालक दिसून येत नसल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे सौजन्यही नगर पालिका दाखवित नसून या मोकाट जनावरांच्या उपद्रवांमुळे वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत असतांनाच अपघातालाही बळी पडावे लागत आहे. शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट चांगलाच वाढला आहे. शहरातील प्रमुख रस्ते या मोकाट जनावरांच्या विसाव्याची ठिकाणं बनली आहेत. शहरातील रहदारीच्या रस्त्यांवर ही जनावरं अगदी मधोमध ठाण मांडून बसली असतात. या मोकाट जनावरांमुळे रहदारीला तर अडथळे निर्माण होतच आहे, पण वाहतुकीचीही कोंडी होतांना दिसत आहे. या मोकाट जनावरांमुळे दुचाकी धारकांना अपघातही झाले आहेत. काही दिवसांआधी वणी वरोरा मार्गावर मोकाट जनावराला दुचाकीची धडक बसल्याने दुचाकीवरील दोघेही जण गंभीर जखमी झाले होते. ही मोकाट जनावरे नेहमी अपघाताचे कारण बनली आहेत. जनावरांचे मालक जनावरांची काळजी न घेता त्यांना मोकाट सोडून देतात. पण जनावरांचा अपघात झाला की, भरपाईसाठी मात्र बरोबर हजर होतात. नगर पालिकाही या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे सौजन्य दाखवितांना दिसत नाही. मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकण्याची प्रथाच बंद झाल्याचे दिसून येत आहे. आधी मोकाट जनावरांना कोंडवाड्यात टाकण्याच्या भीतीने जनावरांचे मालक आपल्या जनावरांची काळजी घ्यायचे. पण आता जनावरांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वणी घुग्गुस मार्गावरही मोकाट जनावरांचे कळप रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून असतात. या मार्गाने नेहमी कोळसा वाहतूक सुरु असते. मालवाहतुकीच्या वाहनांनी कित्येक जनावरांचे बळीही गेले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अपघाताचे कारण बनू पाहणारी ही मोकाट जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी अन्यथा गौरक्षण संस्थांकडे द्यावी अशी आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे.