सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (०९ ऑगस्ट) : तालुक्यातील खेडी येथील शेतकरी विनोद वसराम चव्हाण यांनी (ता.६) ला स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये कपाशी या पिकावर आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाकरिता कीटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
विनोद वसराम चव्हाण असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून वनोली शिवारात विनोद चव्हाण यांची ५ एकर शेती असून, यंदा त्यांनी कपाशीची लागवड केली आहे. पाऊस मान अतिशय समाधानकारक आहे. कापूस हे पिक उत्तम बहरल असून, पण बारोमास कष्टाच्या वस्तीत राहणाऱ्या शेतकर्यांच्या वेदना ला न संपणारा अंत आहे.
अवेळीच गुलाबी बोंड अळीने या पिकाला नख लावल्याने हा पांढरं सोनं काळवंडल असुन प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे. या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने मृतक चव्हाण यांनी नियंत्रण व्यवस्थापनाकरिता रोखण्यासाठी त्यांनी शेतामध्ये कीटकनाशकाची फवारणी केली व अती विषारी कीटकनाशक निव्योक्रान फवारणी करताना विषबाधा झाली. शेतातच त्यांची प्रकृती चिंताजनक झाली उपचारासाठी त्यांना तातडीने दिग्रस येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने योग्य उपचाराकरिता मेडिकल यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. दरम्यान, वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विनोद चव्हाण यांच्या पश्चात त्यांची पत्नी बेबीताई चव्हाण, अनिकेत, गोलू अशी दोन मुलं व एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. एका मुलीचे लग्न झाले असून, एका मुलगी अविवाहित आहे. शिवाय लहान मुले असून कुटुंब प्रमुख म्हणून कर्त्या वडीलांच्या आकस्मिक मृत्यू झाल्याने संपूर्ण शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मृतक विनोद चव्हाण अत्यंत सुस्वभावी व सर्जनशील व्यक्तिमत्त्वाचे धनी त्यामुळे या घटनेने संपूर्ण गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामातील विषबाधेचा राज्यातला पहिला बळी पडलेला विनोद चव्हाण हे आहेत. या घटनेने अवघ्या राज्यामध्ये खळबळ उडाली आहे गतवर्षी सारखे या वर्षी पण गुलाबी बोंड अळीचे प्रादुर्भाव आल्याने या पिकाचे उत्पादनच आता धोक्यात आले आहे. लावगड खर्चसुद्धा शेतकऱ्यांना यामधून काढता येणार नाही हे भीषण वास्तव शासन व प्रशासनाला सर्वश्रुत आहे आर्थिक दृष्ट्या शेतकरी आता उध्वस्त होणार तेव्हा केंद्र शासनाने जीएम टेक्नॉलॉजी जेनेटिक मॉडिफाइड झालेल्या कॉटन सीड च्या ट्रायल वरची बंदी उठवावी अशी मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकरी नेते मनीष जाधव यांची चव्हाण कुटुंबियांना भेट व सांत्वन
शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांना या घटनेची माहिती मिळताच शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील असलेले विनोद भाऊ वसराम चव्हाण यांच्या राहत्या घरी, खेडी येथे जाऊन तातडीने या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व तेथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. पुन्हा अशी घटना घडणार नाही अशी दक्षता घेण्याच्या संदर्भाने सूचना ही केल्या. या वेळी मृतक विनोद चव्हाण यांच्या कुटुंबियांना तातडीने शासन स्तरावर मदत मिळावी म्हणून उपजिल्हाधिकारी ललित भाऊ वऱ्हाडे व नवनाथ कोळकर, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क साधून तातडीने यांना शासनाने निकषाच्या आधारावर कार्यतत्परतीने तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी. अशी जिल्हा प्रशासनाला व शासनाकडे मागणी केली.
दरम्यान गावकरी मोठ्या संख्येने या कुटुंबांच्या सांत्वन करिता उपस्थित होते. यावेळी शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव ,नरेंद्र जाधव, माजी सरपंच खेडी (वानोली) , विलास चव्हाण, सुभाष जाधव वानोली
गणेश आदी उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनीष भाऊ जाधव यांचा प्रशासनावर थेट आरोप व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
विनोद चव्हाण हा निष्पाप शेतकरी व्यवस्था व यंत्रणेचा हकनाक बळी गेला असून, यासाठी कृषी विभागाची निष्क्रियता या शेतकऱ्याच्या दुरवस्थेला जबाबदार असून जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस या पिकावर गुलाबी बोंड अळी प्रादुर्भावाची चे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे.
पूर्व नियोजन केलेल्या जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच पूर्ण नियोजन हे कागदावरच राहिले असून, प्रत्यक्ष या विषयाच मार्गदर्शन बांधावर जाऊन अंमलबजावणी होणे क्रमप्राप्त होते. पण असे या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात घडले नाही. वेगवेगळ्या अतिव्रतेच्या कीटकनाशकाचे वापर करून या प्रादुर्भावाचे रोगाचे व्यवस्थापन व नियोजन शेतकरी करत आहे. परंतु शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना बांधावर मिळत नसल्याने अशा प्रातिनिधिक स्वरूपाच्या घटना घडत आहे. कृषी विभागाच्या व जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून मी (ता.३) ऑगस्टला दादासाहेब भुसे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य व कृषी आयुक्त पुणे, यांच्याकडे लेखी पत्र यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मागणी केली होती की, संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन कृषी विभागाच्या माध्यमातून गुलाबी बोंड अळी नियंत्रणाच्या संदर्भाने मार्गदर्शन करण्यात यावे व १००, टक्के अनुदान तत्वावर फेरोमन ट्रॅप, लाईटचा ट्रॅप चा वाटप करण्यात यावा. पण दुर्दैवाने या विधायक मागणीकडे कृषी विभागाने व जिल्हा प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने आज एका निष्पाप शेतकऱ्याला या घटनाक्रमामुळे बळी पडाव लागल. हे अत्यंत दुर्दैवी घटना असून हे यंत्रणा व शासन प्रशासनाकडून प्रत्यक्षात हत्या आहे. याची नैतिक जबाबदारी कृषिमंत्र्यांनी घेऊन या कुटुंबाला तातडीने शासनस्तरावरून मदत करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात येत आहे व याला जबाबदार असणाऱ्या कृषी मंत्र्यांसह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी महागाव यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे असे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष यवतमाळ, शेतकरी नेते मनीष भाऊ जाधव यांनी केली आहे.